नाशिक : पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीनं संप मागे घेतल्यानंतर, आंदोलनाचं नेतृत्त्व स्वीकारण्यासाठी इतर शेतकरी नेते पुढे सरसावले आहेत. शेतकरी संपाचं पुढचं धोरण ठरवण्यासाठी नाशिकमध्ये शेतकरी नेत्यांची सभा सुरू असून, यात उद्या 5 जून रोजीची महाराष्ट्र बंदची हाक पुन्हा देण्यात आली.


शेतकरी नेत्यांच्या आजच्या बैठकीत किमान पुढचे चार दिवस संप सुरू ठेवण्याचा निर्णय आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाऐवजी अंमलबजावणी करावी, अशी मागणी बैठकीतल्या शेतकरी नेत्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये अडत व्यापारी, वाहतूकदार, नागरिक यांनी सहभागी व्हावं, असंही आवाहन यावेळी करण्यात आलं. या बैठकीला बुधाजीराव मुळीक, अजित नवले, रामचंद्रबापू पाटील आणि रघुनाथ दादा पाटील इत्यादी नेते उपस्थित आहेत.

दरम्यान, शेतकरी संपाचं केंद्र आता पुणतांब्यावरुन नाशिककडे सरकलं आहे. शेतकरी संपासंदर्भातील सर्व निर्णय नाशिकमध्येच घेण्यात येत असून, यामुळे शेतकरी संपातील फूट वाढत असल्याचं चित्र आहे.

दुसरीकडं शेतकरी संपामध्ये आता राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. कारण आज राज्यातल्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीने सक्रीय साथ दिल्याचं दिसून आलं.

तर  सत्तेतला वाटेकरी असलेल्या शिवसेनेच्या युवासेनेने आज उस्मानाबादमध्ये चक्काजाम केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सत्ता सोडा अशा घोषणा खुद्द युवासैनिक देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय बळ मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.