कोल्हापूर : शेतकरी संपात फूट पडल्याचा सरकारवर आरोप होत असताना सरकारने आता विरोधकांवर पलटवार करायला सुरुवात केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. आता शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवणाऱ्या शरद पवार यांना 15 वर्षात हमीभाव का देता आला नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना केला आहे.


कोल्हापुरात पत्रकाराशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गेल्या 15 वर्षात शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला तुमचे हात काय बांधले होते काय असा सवाल विचारत पवार यांना शेतकऱ्यांचा राजा ही मिळालेली पदवी जाईल अशी भीती असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच ती पदवी जाईल या भीतीनंच ते बेछूट आरोप करत असल्याची घणाघाती टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केली आहे.

शेतकऱ्यांचा संप मिटल्यामुळं काहींची दुकानं 2 दिवसांतच बंद झाली, मात्र या 2 दिवसांत लूट करणारे कोणत्या पक्षाचे आहेत ते पाहा, असं सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संपामध्ये शेतकरी दूध फळं वाया घालवत नाही, पण शेतकऱ्यांच्या नावानं बदनामी सुरु असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. शेतकरी नेत्यांना अजूनही चर्चेची दारं खुली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.