सांगली महापालिकेत सर्वच पक्षांसमोर बंडखोरांचं आव्हान
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2018 10:49 PM (IST)
अनेक प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांना त्यांच्या पक्षातील अपक्ष बंडखोरांनी आव्हान निर्माण केल्याने मोठी चुरस निर्माण होणार आहे.
सांगली : अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सांगली महापालिकेतील सर्वच पक्षाचे बंडखोर रिंगणात राहिले आहेत. अनेक प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांना त्यांच्या पक्षातील अपक्ष बंडखोरांनी आव्हान निर्माण केल्याने मोठी चुरस निर्माण होणार आहे. सर्वच प्रभागात नाराज बंडखोर आणि अपक्ष आघाडी यांच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले नाही. त्यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. महापालिकेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल 350 उमेदवारांनी माघार घेतली. 78 जागांसाठी 450 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. सांगली महापालिकेसाठी एक ऑगस्टसाठी मतदान होणार असून मुदतीमध्ये 1128 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत सुमारे 153 अर्ज अवैध ठरले. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारावर दबाब आणला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.