मनमाड : नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे उष्माघात आणि अन्य कारणाने सुमारे 35 ते 40 मोरांचा मृत्यू झालाची घटना समोर आली आहे.


चांदवड तालुक्यातील दहिवत, दिघवत या परिसरात मोरांची मोठी संख्या आहे. सध्या उन्हाचा पारा चाळीशीच्या पुढे जात असल्याने पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या मोरांना उष्माघाताचा त्रास होऊन, त्यात अनेक मोर मृत्यूमुखी पडले आहे.

मागील महिन्याच्या 14 तारखेपासून ते आजपर्यंत एकूण 40 मोर मृत्यूमुखी पडल्याचं परिसरातील ग्रामस्थ सांगतात. मात्र उष्माघाताने 13 मोर मृत्यूमुखी पडले असून जखमी तीन मोरांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आलं आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नऊ मोरांची नोंद करण्यात आल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अन्य मोरांचा मृत्यू कशामुळे झाला आणि त्यांचे शव कुठे गेले हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या मोरांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणांवर वनविभागाने अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तरीही महिनाभरात राष्ट्रीय पक्ष्याचे मोठ्या प्रमाणात झालेले मृत्यू हे दुर्दैवीच म्हणावं लागेल.