सातारा : ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएम मशीनची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितलं. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, असं  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.  पवार साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते.




सगळ्याच मशीनमध्ये असं असेल असं मी म्हणत नाही मात्र मी हे पाहिलेलं आहे म्हणून मी काळजी व्यक्त केली असे पवार म्हणाले. यासाठी आम्ही कोर्टात गेलो, मात्र दुर्दैवानं कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं नाही. आम्ही 50 व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या. त्या चिठ्ठ्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षा मोठ्या देखील होत्या, असे पवार यांनी सांगितलं.



हयात नसताना राजीव गांधी यांच्यावर टीका होणं चांगलं नाही : पवार


हयात नसताना राजीव गांधी यांच्यावर टीका होणं चांगलं नाही, अशी  प्रतिक्रिया पवार यांनी दिली. राजीव गांधी हे भ्रष्टाचारी होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. यावर पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजीव गांधींचा मृत्यू क्लेशदायक होता. गांधी परिवाराने दोन पंतप्रधान देशाला दिले. दोघांचीही हत्या झाली. एवढा मोठा त्याग या परिवाराने केल्यानंतर नरेंद्र मोदींची अशी भाषा शोभणारी नाही. आपण पंतप्रधान पदावर आहोत. या पदावर असताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र अशी काळजी न घेता अशा प्रकारची भाषा मोदींकडून बोलली जात आहे, हे दुर्दैवी आहे, असे पवार म्हणाले.

मी स्वतः संरक्षण मंत्री होतो. त्यावेळी मी ही युद्ध नौकांनी अंदमान वगैरेला गेलो होतो. या युद्धनौका सतत फिरत असतात. यात जर देशाचा पंतप्रधान युद्धनौकांनी फिरत असेल तर त्यात गैर काय आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. यामुळे युद्धनौकांवर काय चालतं याचा अभ्यास होतो, असेही ते म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.  यावेळी पवार म्हणाले की, लोकसभेच्या नंतर पुढील निर्णयांसाठी सर्व विरोधी पक्षातील लोकांची बैठक होईल असे ते म्हणाले. पंतप्रधानपद कुठल्या राज्याला मिळेल हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. आम्हाला परिवर्तन करायचे आहे. परिवर्तनाला समर्थन देणाऱ्या घटकांना एकत्र आणणे गरजेचे आहे. त्यामुळे आधी आम्हाला बहुमत कसे होईल यावर भर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. लोकसभेला महाराष्ट्रातील महाआघाडीचा आकडा मोठा असेल. देशातीलच जागांबाबत आकडे अनुकूल असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

दुष्काळी परिस्थितीला आचारसंहितेच कारण जोडणे योग्य नाही
यावेळी राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, आम्ही दुष्काळाच्या परिस्थितीवर मात व्हावी म्ह्णून राज्यभरात फिरलो. आमचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दुष्काळाचे राजकारण करणे योग्य नाही. असं करायचं असतं तर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो नसतो, असेही ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीला आचारसंहितेच कारण जोडणे योग्य नाही, असेही ते यावेळी म्हणाले. दुष्काळाच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार विलंब लावत असल्याचा आरोप देखील पवार यांनी केल्या.