31st August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या पराभवासाठी देशपातळीवरील विरोधी पक्षांनी एकत्रित मोट बांधत 'इंडिया' आघाडीची घोषणा केली आहे, या आघाडीची आज मुंबईत बैठक होणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर महायुतीची देखील बैठक होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील महायुतीतील सर्व पक्षांची तातडीची बैठक बोलावली आहे. यासह आजच्या इतर घडामोडींवर देखील नजर टाकूया.


इंडिया आघाडीची आजपासून मुंबईत बैठक


इंडिया आघाडीची आज मुंबईतल्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातील 28 विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत. ही बैठक यशस्वी होण्याकरीता राज्यातील महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. विविध विचारधारा असलेले देशभरातील पक्ष इंडिया आघाडीअंतर्गत एकत्र आले आहेत. एनडीए आणि पर्यायाने भाजपाला टफ फाईट देण्याकरिता इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वात मोठी अडचण ठरणार आहे ती जागा वाटपाची. जवळपास सर्वच पक्ष एकत्र आल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. जागावाटपाबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार का? आघाडीचा संयोजक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा होणार? हे पाहणं आज महत्त्वाचं ठरेल.


महायुतीची देखील मुंबईत बैठक


आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 'एनडीए' युतीची देखील मुंबईत बैठक होणार आहे. महायुतीची महत्त्वाची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक पार पडणार आहे.  दोन दिवस भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसह महायुतीची संयुक्त बैठक पार पडणार आहे, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. त्याचसोबत मतदारसंघातील काही प्रश्न असतील. या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. या महत्वाच्या बैठकीसाठी उपनेते यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे. संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम आणि चर्चा होणार आहे.


वरळीत आज प्रो गोविंदा स्पर्धेचा थरार


राज्य सरकारच्या वतीनं मुंबईत पहिल्यांदाच प्रो गोविंदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे, यासाठी दहीहंडी समन्वय समिती आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. वरळीतील इनडोअर स्टेडियममध्ये संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रो-गोविंदा स्पर्धेसाठी येणाऱ्या गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आलं आहे. यासाठी राज्यभरातील 50 हजार गोविंदांचा विमा उतरवण्यात आला असून मुंबईतील 20 गोविंदा पथकांतील 3 हजार 500 गोविंदांना विम्याचा लाभ होणार आहे.


सुप्रीम कोर्टात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांवर सुनावणी


जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार? यावर केंद्र सरकार आज सर्वोच्च न्यायालयात उत्तर देणार आहे. कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचा आज 13 वा दिवस आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका कधी होतील आणि त्याला राज्याचा दर्जा केव्हा मिळेल, हे केंद्र सरकार आज न्यायालयाला उत्तर देऊ शकते.