पुणे : चाकण हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी धरपकड सुरू केली. या प्रकरणात 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.


पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये चाकणमध्ये कामासाठी आलेले, तसंच झोपडपट्टी आणि आसपासच्या गावांतील व्यक्तींचा  समावेश आहे.

चाकणमधील जाळपोळ ही स्थानिकांनी नव्हे तर बाहेरुन आलेल्या लोकांनी केल्याचा अंदाज आधीच पोलिसांनी वर्तवला होता.

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागलं. चाकण बंद दरम्यान मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसंच काही ठिकाणी पोलिसांवरही हल्ले करण्यात आले होते.

दरम्यान, याआधीही पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. जाळपोळप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.