औरंगाबाद : मराठवाड्यात सलग दुसऱ्या वर्षीही शेतकरी आत्महत्यांनी एक हजारचा आकडा पार केला आहे. आत्महत्यांचं सत्र या वर्षातही सुरु असून 1 जानेवारी ते 12 डिसेंबर 2016 या काळात तब्बल 1003 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.


दुष्काळामुळे गेल्यावर्षी म्हणजे 2015 मध्ये 1 हजार 130 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर यावर्षी देखील हा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे.

बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत 214 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढला नसला तरी देखील ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे. गेल्या वर्षी एकूण 300 शेतकरी दुष्काळाचे बळी ठरले होते.

बीडनंतर नांदेडमध्ये यावर्षी सर्वाधिक 170 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. तर उस्मानाबाद 153, औरंगाबाद 145 आणि लातूरमध्ये 108 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. जालना, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा कमी शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

आत्महत्या केलेल्या एक हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबांपैकी 661 कुटुंबांना शासकीय मदत देण्यात आली आहे. सतत चार वर्षे पावसाने ओढ दिल्याने कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या वर्षात देखील शेतकरी आत्महत्यांचं सत्र मागच्या वर्षीप्रमाणेच कायम राहिल्याचं चित्र आहे.