Buldhana News : राज्यातील काही भागत अतिसाराचं (Diarrhea) संकट वाढत असल्याची चित्र आहे. असे असताना महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या दुर्गम अशा बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील गोमाल गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोमाल या गावामध्ये अतिसाराच्या लागणमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झालाय. तर अनेक रुग्ण हे जळगाव जामोद आणि  मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहन जायला रस्ता नसल्याचे चित्र आहे.


परिणामी, अतिसारामुळे मृत झालेल्या रुग्णांना रुग्णालयात न्यायला वेळ झाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मृत्यूनंतरही या रुग्णांचे मृतदेह गावात नेण्यासाठी 15 किलोमीटर झोळीत टाकून त्यांना न्यावे लागले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ता नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तर राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले असून या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये प्रचंड वायरल होत आहे.  


गावात अतिसाराची लागण,आरोग्य प्रशासन अनभिज्ञ?


तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य प्रशासनाला या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्वला पाटील यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितलंय. त्यामुळे गोमाल गावात अतिसाराची लागण असल्यावरही बुलढाणा आरोग्य प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती आहे. तर गोमाल या गावात आणि परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जळगाव जामोद तालुक्यात विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी आणि भूमिपूजनासाठी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे या गोमाल गावाला भेट देतात का? हे बघणं महत्त्वाचं असेल. तर या घटनेत मृत पावलेल्या तिघांची नावे सागरीबाई हिरू बामण्या(वय १८ वर्ष),   जिया अनिल मुजालदा (वय २ वर्ष)  आणि रविना कालू मुजालादा (वय ५ वर्ष) अशी आहेत.  


अतिसाराची लक्षणे :


अतिसार झालेल्या बालकात सौम्य किंवा गंभीर जलशुष्कता, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटा घटा पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतला असल्यास हळूहळू पूर्ववत होणे, बेशुद्ध अवस्थेत पडणे, स्तनपान टाळणे किंवा बळजबरीने स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात.


 दरम्यान, जे बाळ स्तनपान करीत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवावे. अतिसार दरम्यान आणि नंतरही जास्तीत जास्त स्तनपान द्यावे. बालक अधिक आजारी असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचातून रक्त पडत असेल, पाणी कमी पीत असेल किंवा ताप येत असेल, यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्यसंस्थेशी, गावातील आशा कार्यकर्ती किंवा ए.एन.एम यांच्याशी संपर्क साधावा.


महत्वाच्या बातम्या:


Anant Ambani : अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत किती?