पालघर : बहाडोली येथे कामासाठी गेलेले 13 कामगार वैतरणा नदीपात्रात अडकले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली. यामुळे हे कामगार नदीतच अडकले आहेत. एनडीआरएफची टीमने घटनास्थळी दाखल होत कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला आहे आणि रात्र झाल्यामुळे एनडीआरएफचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. 


या कामगारांना सोडवण्यासाठी आता राज्य शासनाकडे मदत मागण्यात आली आहे. वाढता पाऊस आणि रात्र या परिस्थितीत कामगारांच्या सुटकेसाठी राज्य शासन काय प्रयत्न करते याकडे लक्ष लागले आहे.


नदीचा प्रवाह वाढल्याने एनडीआरएफचे प्रयत्न अयशस्वी
मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे महामार्गाचे काम वैतरणा नदीत सुरू आहे. याच कामासाठी हे 13 कामगार नदीत गेले होते. मात्र जिल्ह्यासह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बहाडोली येथे काम करणारे 13 कामगार नदीत फसले. 


याबाबत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी कोस्ट गार्डकडे फसलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी एअर लिफ्टची मदत मागितली. मात्र अशा धोकादायक वातावरणात एअर लिफ्ट शक्य नसल्याने कोस्ट गार्डने मदत करण्यास नकार दिल्याचे कळते. त्यानंतर एनडीआरएफला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र नदीचा प्रवाह वाढल्याने एनडीआरएफचे प्रयत्नही अपयशी ठरले. त्यामुळे आता फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी राज्य शासन काय प्रयत्न करते याकडे लक्ष लागले आहे. या घटनेला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला असून या कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: