नवी दिल्ली : 'पासपोर्ट आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्या अंतर्गत महाराष्ट्रात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला ही माहिती दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या 36 होणार आहे.


राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी या ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.

नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने 'पासपोर्ट आपल्या दारी' या कार्यक्रमा अंतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी 2017 मध्ये देशभरात 289 पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्याटप्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून देशभरात आतापर्यंत 218 पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत.

या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात 87 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 11 नवीन केंद्र उभारण्यात येणार असल्याचं डॉ. मुळे यांनी सांगितलं.


पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात 25 पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत 14 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. तर 4 सप्टेंबर 2018 रोजी बारामतीत नवीन केंद्राची सुरुवात होणार असल्याचं डॉ. मुळे यांनी सांगितलं.

गेल्या दीड वर्षात सुरु झालेल्या 14 नवीन पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी,  पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरु झाले आहे.

बारामतीत 4 सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून त्यानंतर अकोला, अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामांना सुरुवात होणार आहे