उस्मानाबाद : अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे माध्यान्ह भोजन न मिळाल्यानं गेल्या 14 दिवसात किमान 100 मुलं दगावल्याचा आरोप केला जात आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी हा दावा केला आहे.


इतकंच नव्हे तर सचिव विनित सिंघल यांच्यामुळे संप चिघळल्याचंही त्यांनी म्हटलं. याशिवाय मंत्र्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावाही देशमुखांनी केला आहे. उस्मानाबादमध्ये 'एबीपी माझा'शी बोलताना भगवानराव देशमुख यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातल्या 2 लाख अंगणवाडी सेविका गेल्या 14 दिवसांपासून संपावर आहेत. मानधनात वाढ आणि इतर सोयीसुविधा यासारख्या मूलभूत मागण्या त्यांनी केल्या आहेत. मात्र सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे आता सरकारमध्ये बसून विरोधकांची भूमिका पार पाडणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांनी आंदोलनात येण्याची विनंती केली आहे.

11 सप्टेंबर पासून अंगणवाडी बंद आहेत. काजळा आणि सारोळा गावात अंगणवाडीत शिकणारी मुलं गावभर फिरत आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घरकामात व्यस्त आहेत. सारोळ्यातली मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊन बसतात. शिक्षक माणुसकी म्हणून मुलांना शिकवून खिचडीचा खाऊ देतात.

अंगणवाड्या सरकारी अनास्थेचा बळी आहेत. जूनपासून अंगणवाड्यांमधील स्टेशनरी संपली आहे. पूरक आहार रजिस्टर, पूर्व प्राथमिक रजिस्टर, हजेरी पुस्तक, मासिक अहवाल पुस्तिका नाहीत. कर्मचाऱ्यांना जूनपासून पगार नाही. तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविका मदतनीस समाधानी नाहीत. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी मानधनात वाढ करुनही कर्मचाऱ्यांनी बंद सुरुच ठेवला आहे.

सध्या अंगणवाडी सेविकांना 5 हजार, मदतनीसांना 2 हजार 500 रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांना 3 हजार 500 रुपये मानधन आहे. पण ते दुप्पट करण्याची मागणी आहे. सरकारने बंद फोडण्याचेही प्रयत्न केले. काही ठिकाणी कारवाईची धमकीही दिली आहे.

पंकजा मुंडेंनी मानधनात केलेली वाढ संघटनेला मान्य नाही. मुंबईतल्या आझाद मैदानावरील आंदोलनात थेट उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.