सातारा : जावळी तालुक्यातील मेढा गावातील एका खासगी व्यक्तीच्या मालकीची मोकळ्या जमिनीची संरक्षक भिंत घरावर कोसळल्यानं दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून, यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत.


गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र माती भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे डोंगराच्या शेजारी राहणाऱ्या लोक जीव मुठीत घेऊन राहात आहेत.

काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मेढा गावात गोपाळ वस्तीतली धनवडे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेवरील संरक्षक भिंत काही घरांवर कोसळली. या घटनेत सहा ते सातजण मातीच्या ढीगाऱ्याखाली आडकले होते. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात इतरही चारजण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर कोणताही शासकीय अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नसल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. तसेच या घटनेनंतर इथल्या नागरिकांचं पुनर्वसन कुठं करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या घटनेनं पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. 30 जुलै 2014 रोजी दरड कोसळल्यानं संपूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेनं अनेकांना सुन्न करून सोडलं होतं.

साखरझोपेत असताना संपूर्ण गाव मातीखाली गेला होता. या दुर्घटनेत 151 जणांचा बळी गेला, तर काहींचे संपूर्ण कुटुंब मातीखाली गाडली गेली होती.