मुंबई : आज होईल, उद्या होईल असं म्हणत सुरु असलेला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा खातेवाटपाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. विस्तार होऊन पाच दिवस झालं तरी ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही. आज, उद्या म्हणत आता थोड्याच वेळात खातेवाटप होईल असा दावाही शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी दुपारी केला होता. मात्र, आतापर्यंत खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यातच काँग्रेसच्या संभाव्य खातेवाटपाची नवी यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. खातेवाटपासह काँग्रेसकडून पालकमंत्र्यांची नाव देखील ठरली आहे. बाळासाहेब थोरात पालकमंत्री पद स्वीकारणार नसल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या वाट्याला 10 पालकमंत्री आल्याने इतर मंत्र्यांना संधी मिळावी म्हणून थोरात पालकमंत्री स्वीकारणार नसल्याची माहिती आहे. मी पालकमंत्री पद जरी घेतलं नाही तरीही अहमदनगर जिल्ह्याचा पालक मी असणार आहे अशी प्रतिक्रिया यावर बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.


या यादीनुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे उर्जा खातं देण्यात आलं असल्याची माहिती आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आहे. तर सतेज पाटील यांना गृहराज्यमंत्री तर विश्वजित कदमांना कृषी आणि सहकार राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

काँग्रेसकडून असं झालं आहे खातेवाटप?
बाळासाहेब थोरात - महसूल
अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत - ऊर्जा
विजय वड्डेटीवार - ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन
के.सी.पाडवी - आदिवासी विकास
यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण
अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार - दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
अस्लम शेख - वस्त्रोद्योग,मस्तव्या साय, बंदरे
सतेज पाटील - गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री

काँग्रेसकडून आलेली पालकमंत्र्यांची यादी
नागपूर - नितीन राऊत
अमरावती - यशोमती ठाकूर
वर्धा - सुनील केदार
मुंबई शहर - अस्लम शेख
लातूर - अमित देशमुख
चंद्रपूर - विजय वडेट्टीवार
नांदेड - अशोक चव्हाण
कोल्हापूर - सतेज पाटील
नंदुरबार - के.सी.पाडवी

सरकार स्थापनेच्या महिनाभरानंतरही तिढा सुटेना
उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांसह शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली. 28 तारखेला मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना अनेक दिवस बिनखात्याचे मंत्री म्हणूनच फिरावं लागलं. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आधी या सहा मंत्र्यांना 12 डिसेंबर रोजी तात्पुरतं खातेवाटप केलं गेलं. त्यानंतर 18 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अखेर 30 तारखेला विस्तार झाला. यात नव्या 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता विस्तार होऊन पाच दिवस होऊनही खातेवाटप झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खातेवाटपासाठी बैठकांची मालिका गेल्या पाच दिवसात सुरू आहे.