Raju Shetti Speech : स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatna) एकमेव अशी संघटना आहे जी शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नासाठी रस्त्यावर उतरते. शेतकऱ्यांनी आता ज्ञानेश्वर माऊलीसारखं (Sant Dnyaneshwar) व्हायला हवं, निर्बुद्ध असलेल्या रेड्यासारखं राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी माऊली व्हावे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केला आहे. ते लातूरमधील (Latur) साकोळ येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते


'आताचे राजकारणी रेडे काहीच कामाचे नाहीत'


ज्ञानेश्वर महाराजांनी निर्बुद्ध रेड्याच्या तोंडी वेद वदवून घेतले होते. हे राजकारणी रेड्यासारखे निर्बुद्ध आहेत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हिताचे काम करुन घ्यायचे असेल तर ज्ञानेश्वर महाराज होणे आवश्यक आहे. आताचे राजकारणी रेडे काहीच कामाचे नसल्याचे वक्तव्य राजू शेट्टी यांनी लातूर येथील शेतकरी मेळाव्यात केलं आहे.


म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही : राजू शेट्टी


विमा कंपनीच्या बोगसपणाबद्दल राज्य आणि केंद्र सरकारकडे अनेक वेळेस पुराव्यानिशी तक्रारी केल्या तरीसुद्धा त्यांच्यावर कसलीच कारवाई होत नाही. कारण विमा कंपनीने जो माल चोरला आहे, त्यातील काही खरकटे राज्य आणी केंद्र सरकारमधील नेत्याच्या आणि अधिकाऱ्यांच्या मिशीला लागलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी लातूर मधील शेतकरी मेळाव्यात केला आहे.


देश दारुड्यांच्या पैशावर चालतो : राजू शेट्टी


लॉकडाऊनमध्ये सर्वात अगोदर दारुची दुकाने सुरु झाली कारण सरकार आजारी पडलं होतं. सरकारच्या तिजोरी रिकामी झाली होती. हा देश दारुड्यांच्या पैशावर चालतो असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे.


साखर कारखानदारांनी FRPची थकबाकी व्याजासह द्यावी लागेल : राजू शेट्टी


गळीत हंगाम संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) अद्याप दिलेला नाही, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला होता. राजू शेट्टी यांनी 29 मार्च रोजी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांची थकबाकी दोन महिन्यांच्या विलंबाने आली असल्याचं त्यांनी गायकवाड यांना सांगितलं. तसंच कारखानदारांनी एफआरपीची थकबाकी व्याजासह द्यावी लागेल, असंही राजू शेट्टी म्हणाले. साखर कारखाने अधिक इथेनॉलचे उत्पादन करुन नफा कमवत आहेत आणि सोबतच साखरेच्या स्थिर दराचाही फायदा घेत असल्याचा दावा त्यांनी केला.


भाजप, मविआ..कोणासोबतच हातमिळवणी करणार नाही : राजू शेट्टी


राजू शेट्टी कायमच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवताना दिसतात. आमचा पक्ष भाजप, महाविकास आघाडी, ठाकरे गट, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणाशीच हातमिळवणी करणार नाही, असा पुनरुच्चार राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना केला होता.