Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) आजरा तालुक्यात चिमणेत शेतातील आग विझवताना पाय घसरून पडल्याने वारकरी वृद्धाचा होरपळून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विठोबा भिमराव नादवडेकर (वय 83) असं मयत वृद्धाचं नाव आहे. एका वारकऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शेतामध्ये पाला एकत्र करून जाळण्यासाठी विठोबा नादवडेकर शेतात बुधवारी (8 मार्च) गेले होते.


आग विझवायला गेलेल्या वृद्धाचा होरपळून मृत्यू


चिमणे-झुलपेवाडी रोडवर असलेल्या झरा नावाच्या शेतामध्ये दिव्यांग नादवडेकर पाला गोळा करण्यासाठी गेले होते. पाला गोळा करून झाल्यानंतर त्यांनी तो पेटवून दिला. मात्र, रणरणत्या उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे पाला पेटवल्यावर आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे भेदरलरेल्या नादवडेकर आग इतरत्र पसरेल म्हणून आग विझवण्यासाठी धडपड करू लागले. मात्र, आग विझवण्याच्या प्रयत्नात दिव्यांग असल्याने त्यांची आग विझवताना ते पाय घसरून पडले. पडल्याने त्यांच्या कपड्यांना आग लागली आणि त्यांचा जागीच होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आग दिसून आली. बाजूलाच धोंडीबा नादवडेकर याचा मृतदेह आगीत होरपळल्या अवस्थेत होता. 


कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी घटना 


दरम्यान, असाच भयंकर प्रकार गडहिंग्लज तालुक्यात घडला होता. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील रामजी गणू जाधव (वय 80) या वृद्धाचा काजू बागेतील पालापाचोळा पेटवत असताना आगीत मृत्यू झाल्याची घटना झाली होती. ‘माळाचे शेत’ नावाच्या शेतात काजूच्या बागेत गेले होते. काजू बागेतील साफ-सफाई करुन पालापाचोळा पेटवत असताना बागेमध्ये आग विझवताना ते आगीमध्ये अडकले. या आगीमध्येच त्यांचा गुदमरुन आणि होरपळू मृत्यू झाला होता. 


अतितापामुळे कोल्हापुरात बारावीत शिकणाऱ्या तरुणीचा मृत्यू


दुसरीकडे, अतिताप आल्याने बारावीत शिकत असलेल्या श्रावणी अरुण पाटील, (वय 18, रा. दुसरा बस स्टॉप, फुलेवाडी, कोल्हापूर) या तरुणीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. श्रावणीचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. श्रावणीच्या या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ती शिवाजी पेठेतील महाविद्यालयात शिकत होती श्रावणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू होती. उर्वरित विषयांचा अभ्यास सुरु असतानाच चार दिवसांपूर्वी श्रावणीला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे उपचारासाठी फुलेवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला रविवारी सकाळी घरी सोडण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी रात्री पुन्हा पुन्हा ताप आला. त्यानंतर सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आणलं जात असतानाच ती बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या