Kolhapur News : लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षांचा कालावधी असला, तरी भाजपकडून आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपकडून देशातील 144 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांचा समावेश आहे. या योजनेबाबत माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूरमध्ये दिली होती. 


आता याच लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय कायदा मंत्री सत्यपालसिंह बघेल उद्या 23 ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राहिल. या दौऱ्याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष मरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यांचा तीन दिवस दौरा असेल.


शिवसेना बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात भाजपचा डोळा!


भाजपकडून ज्या 144 मतदारसंघात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, त्यामध्ये राज्यातील सर्वाधिक मतदारसंघ बंडखोर शिवसेना खासदारांचे आहेत. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टता करताना लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ही रणनीती असल्याचा दावा केला.


मात्र, ज्या पद्धतीने भाजपकडून बंडखोरांच्या मतदारसंघात मोर्चबांधणीस सुरुवात केली आहे ते पाहता निश्चितच बंडखोरांसमोर कायदेशीर पेच निर्माण झाल्यास किंवा राजकीय तडजोड म्हणून भाजपच्या चिन्हावर मैदानात उतरवले जाणार का? हे येणारा काळच सांगेल. 


बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना जबाबदारी


भाजपने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या 16 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. या मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिली आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येणार आहेत. भाजपच्या मिशन 45 साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. 


कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?


बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या