Devendra Fadnavis on Kolhapur: कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (7 जून) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृह खात्याला निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल रस्त्यावर आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वत: शिवाजी चौकात रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे, आज सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमल्या. पोलिसांकडून ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, संघटना रॅली काढण्यावर ठाम होत्या. पोलिसांनी विरोध रॅलीला परवानगी दिली नाही. यानंतर पोलीस आणि संघटनांमध्ये बाचाबाची झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे शिवाजी चौक परिसराला लागून असलेल्या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी रस्त्यावर चपलांचा ढीग पडला होता.


साडेबाराच्या सुमारास पुन्हा हिंसक वळण 


दरम्यान, पोलिसांनी  शिवाजी चौकातील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, मनपा शिवाजी चौक भागातील बहुंताश भाग चिंचोळ्या रस्त्यांचा आहे. त्यामुळे या भागात दबा धरुन बसलेला जमाव पुन्हा रस्त्यावर आला. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत जमावाला लाठीचा प्रसाद देऊन पांगवलं. शहरातील पान लाईन, महाद्वार रोड, माळकर तिकटी, बारा इमाम परिसर, शिवाजी रोड, अकबर मोहल्ला परिसरात जमावाकडून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगवतानाच प्रत्येक चौकात फौजफाटा तैनात केला आहे.


दरम्यान, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की कोल्हापूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक परिसर वगळता इतर ठिकाणी शांतता असल्याचे ते म्हणाले. इतर तालुक्यांमध्ये दुकाने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, कोल्हापूरमध्ये बंदी आदेश असतानाही आंदोलन होत असल्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, काल त्यांनी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आंदोलन करत आहेत. आम्ही याबाबत रिस्पॉन्स करत आहोत. विद्यार्थ्यांसह कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांना केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या