कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) दमदार यश मिळवताना तब्बल 30 जागा जिंकल्या आहेत. सांगलीमधील अपक्ष विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या 31 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत दहा जागांपैकी तब्बल आठ जागा जिंकल्याने शरद पवारांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आह. पक्ष फोडून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना सुद्धा तगडा झटका दिला आहे. 

Continues below advertisement

सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं

नेमका आता हाच धागा पकडत कोल्हापूरमध्ये लागलेल्या बॅनर्सची सुद्धा चांगली चर्चा रंगली आहे. कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमधील चांगलाच चर्चेला विषय झाला आहे. स्टँड परिसरातील लावलेला हा बॅनर युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती असल्याने हे नेते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठिशी होते. मात्र, संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. इतकेच नव्हे तर कागल मतदारसंघ हा मुश्रीफ आणि मंडलिक यांचा बालेकिल्ला असूनही अपेक्षित मताधिक्य घेता आलं नाही. 

Continues below advertisement

दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित करताना बारामती, शिरुर, माढा मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. त्यामुळे अजित पवार गट पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा जोरदार लीड घेत अजित पवार यांना शरद पवार यांनी चांगलाच धोबीपचाड दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा इशाराच एकप्रकारे दिला आहे.  लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मार्गावर असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील या उपरोधिक बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या