Shahu Maharaj : लोकराजा, समतेचा राजा, देशातील शोषित, वंचितांच्या आरक्षणाचे जनक, करवीर नगरीचे विधाते, कोणतेही हत्यार हाती न घेता सामाजिक क्रांती करणारे युगप्रवर्तक राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या दुरदृष्टीनेच आज कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा सधन आणि समृद्ध आहे. या भूमीने पुरोगामी चळवळीला नेहमीच नेतृत्व दिलं आहे. या भूमीने जेव्हा जेव्हा समतेसाठी एल्गार केला तेव्हा त्याचे देशपातळीवर पडसाद उमटले आहेत. या राजाची उपकाराची जाण आजही विसरता येत नाही. जे आहे ते शाहू महाराजांनी दिलेल्या मेहनतीचे फळ आहे, बाकी राजकारण्यांनी आजतागायत फक्त रेघोट्या मारण्याचे काम केलं आहे. मात्र, आता त्याच रक्तातील गादीकडे पुरावे मागण्याची मजल कोल्हापूरच्या राजकीय वळचणीसाठी हवी तशी कुस बदलणाऱ्या संजय मंडलिकांची गेली आहे. 


महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला असतानाचा धर्मांध प्रवृत्तींनी शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीरनगरीची पुरोगामी राजधानी ओळख पुसण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने सुरु आहेत. या भूमीला शिवराज्यभिषेक दिनी दंगलीचा डाग लागला. तेव्हाच अवघा कोल्हापूर जिल्हा भयभीत झाला असताना रस्त्यावर उतरुन करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी रस्त्यावर उतरत कोल्हापूरला नख लावू देणार नसल्याचा निर्धार केला होता. मात्र, त्यावेळी संजय मंडलिकांना त्यांच्या थेट वारशाची आठवण झाली नव्हती. मात्र, राजकीय चिखलफेकीत वारसा काढून कोणत्या बुद्धिमतेची झलक दिली, याचाच विचार करण्याची वेळ आली आहे. 


संजय मंडलिक ज्या भूमीतून येतात त्या कागलचे यशवंतराव करवीर नगरीचे राजर्षी शाहू छत्रपती झाले याचा विसर राजकीय कोलांटउड्या मारण्याचा नादात विसर पडला आहे का? किंवा संभाजीराजे 2009 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात असतानाही याच शाहू महराजांनी तत्कालिन उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी असलेल्या मैत्रीत वितुष्ठ आले नव्हते. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात राजकीय चिखलफेक ज्ञात असली, तरी करवीर गादीवर चिखलफेक करताना विवेकबुद्धीचे स्मरण झाले नाही का? असाही प्रश्न उपस्थित होतो.


आता, थोडं इतिहासात डोकावून पाहू 


मात्र, दत्तक विधान आणि संस्थान असा गेल्या दीड दोन शतकांचा इतिहास आहे. यामध्ये करवीर संस्थान सुद्धा मागे नाही. करवीरनगरीच्या लोकराजाची ओळख करवीर संस्थानला 17 मार्च 1884 रोजी झाली होती. या घटनेला मागील महिन्यात 140 वर्ष पूर्ण झाली. करवीर संस्थानातील दत्तकविधी त्याच दिवशी पार पडला होता. 


ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांनी तो प्रसंग 'राजर्षी शाहू छत्रपती महाराज 'या पुस्तकातून मांडला आहे. 


चौथ्या शिवाजी महाराजांचा झालेला मृत्यू त्यानंतर एकट्या पडलेल्या त्यांच्या पत्नी आनंदीबाई आणि त्यानंतर झालेला दत्तकविधी यांचा उहापोह डाॅ. पवार यांनी 'करवीर संस्थान व दत्तक विधान' मधून मांडला आहे. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलमध्ये झाला. शाहू महाराजांचे बालपणातील नाव यशवंतराव होते. आईचे नाव राधाबाई, तर वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे होते. आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी रक्ताच्या नात्याने संबंध होता. त्यावेळी आबासाहेब करवीर संस्थानचे राजप्रतिनिधी (रिजंट) होते. 


करवीर संस्थान व दत्तक विधान काय आहे तो प्रसंग?


आबासाहेब करवीर संस्थानचे रिजंट म्हणून निवड झाली त्यावेळी करवीरचे छत्रपती म्हणून तेव्हा चौथे शिवाजी महाराज गादीवर होते. त्या काळात इंग्रजांचे राज्य होते आणि करवीर संस्थानावरही इंग्रजांचा कब्जा होता. चौथ्या शिवाजी महाराजांना इंग्रज स्वतंत्रपणे कारभार करू देत नव्हते. माधवराव बर्वे हा संस्थानचा त्या वेळी 'दिवाण' होता. मात्र, तो चौथ्या शिवाजी महाराजांना सतत त्रास देत होता. इंग्रज अधिकाऱ्यांकडे मुद्दामच महाराजांची बदनामीकारक तक्रारही करीत असे. दुसरीकडे, शिवरायांचा प्रचंड आदर असल्याने करवीरचे संस्थान अबाधित राहिले होते. शिवाजी महाराजांच्या गादीचे वारसदार म्हणून करवीर घराण्यातील छत्रपतींना सर्व महाराष्ट्रातील लोक आदर देत होते. अशा प्रकारच्या लोकनिष्ठेमुळेच इंग्रजांना करवीरचे संस्थान मनात असूनही बरखास्त करता आले नव्हते. या गोष्टीचा राग अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनाही होता. मात्र माधवराव बर्व्यासारखे काही मतलबी लोकही करवीरच्या गादीचा द्वेष करीत होते.


चौथे शिवाजी महाराज मनोरुग्ण असल्याचे सांगितले


दिवाण असलेल्या बर्वे या अधिकाऱ्याने उद्दामपणाचा कळस करताना चौथे शिवाजी महाराज मनोरुग्ण असल्याचे इंग्रजांना मुद्दामच सांगितले. मतलबी इंग्रजांनी त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि चौथ्या शिवाजी महाराजांना अटक करून त्यांना अहमदनगर येथील किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. अहमदनगर येथील किल्ल्यात इंग्रज अधिकाऱ्यांनी चौथ्या शिवाजी महाराजांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यातच एकदा एका मग्रुर इंग्रज अधिकाऱ्याबरोबर झालेल्या झटापटीत चौथ्या शिवाजी महाराजांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यावेळी महाराजांचे वय केवळ 21 होते. त्यांच्या पत्नी राणी आनंदीबाई या तर वयाने खूपच लहान होत्या. त्यांना मुलबाळ वगैरे काहीच नव्हते. 


करवीरची गादी पोरकी झाली


या दुर्दैवी घटनेनंतर करवीरचं राजसिंहासन पोरकं झालं. एकीकडे शोक आणि दुसरीकडे इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनांत प्रचंड असंतोष आणि राग उफाळून येऊ लागला. करवीर संस्थानही खालसा होणार? अशीही चर्चा रंगली होती. त्यामुळे लोकभावना  ध्यानात घेऊन आबासाहेबांनी इंग्रजांशी बोलणी केली. आनंदीबाईंचे आणि राजपरिवाराचे त्यांनी सांत्वन करत करवीर संस्थानसाठी दत्तक वारस मंजूर व्हावा म्हणून त्यांना इंग्रज सरकारकडे अर्ज करण्यास सुचविले.


आनंदीबाईंचा पुढाकार


त्या कठीण परिस्थितीतही आनंदीबाईंनी आपले आभाळाएवढे दुःख बाजूला ठेवले. शिवछत्रपतींच्या गादीचे महत्त्व आणि रयतेच्या श्रद्धेचा मान राखत आनंदीबाईनी दत्तक वारस मंजूर करावा. कोल्हापूर संस्थानचे रिजंट आबासाहेब घाटगे यांचे थोरले चिरंजीव यशवंतराव यांना दत्तक घेण्याची संमती द्यावी, म्हणून मुंबईच्या गव्हर्नराकडे अर्ज केला. आबासाहेब हे तर कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार होते. शिवाय ते शिवछत्रपतींच्या रक्ताच्या नातेसंबंधातीलही होते. 


...आणि यशवंतराव शाहू छत्रपती झाले


यशवंतराव त्या वेळी वयाने दहा वर्षांचे आणि थोरले होते. तब्येतीने जसे ते धट्टाकट्टे होते, तसेच बुद्धीनेही तल्लख होते.  साहजिकच करवीर संस्थानचा दत्तक वारस म्हणून आनंदीबाई आणि राजपरिवारातील इतर सदस्यांनी यशवंतरावांची एकमताने निवड केली. त्यांच्या या निवडीस सर्वांनी आनंदाने संमती दिली. आनंदीबाईंनी मग यशवंतरावांना विधिवत दत्तक घेतले. शास्त्रोक्त पद्धतीने केलेला तो दत्तक विधी समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. तो दिवस होता 17 मार्च 1884. या समारंभात यशवंतरावांची करवीर संस्थानचे राजे म्हणून घोषणा करण्यात आली आणि त्यांचे नाव ठेवण्यात आले 'शाहू छत्रपती'. आणि 'शाहू छत्रपतींचा विजय असो!, छत्रपती शिवाजी महाराज की जय...!' असा जयघोष झाला. 


(ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांच्या 'राजर्षी शाहू छत्रपती महाराज' यांच्या पुस्तकातून साभार)


इतर महत्वाच्या बातम्या