Sambhajiraje Chatrapati : अवकाळी आणि गारपीठमुळे संकटात असलेल्या राज्यातील बळीराजाला मदत करण्यासाठी विनंती करत असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात त्यांनी संवाद साधला. सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, विधिमंडळात कशाला जाऊन बसता? आता खऱ्या अर्थाने हेलीकॉप्टरने फिरण्याची गरज असल्याचे संभाजीराजे (Sambhajiraje Chatrapati) यांनी म्हटले आहे. ज्या पद्धतीने कृषिमंत्री यांनी फिरायला पाहिजे होतं, तसं फिरले नसल्याचे ते म्हणाले. 


बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो : संभाजीराजे 


संभाजीराजे यावेळी बोलताना म्हणाले की, नववर्षाच्या निमित्ताने सरकारने अडचणीत असलेल्या बळीराजाला मदत करायला पाहिजे, अशी विनंती करतो. बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो, दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे. मागणी झाली की, मदत होऊ नये, लाँग टर्म मदत करणं गरजेचं आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सुपीक महाराष्ट्र असताना सगळ्यात जास्त आत्महत्या राज्यात का होतात? हे 25 वर्षांपूर्वी नियोजन केलं त्याच पद्धतीने चाललो आहे नवीन काही नाही. 


स्वराज्य संघटनेवरून राजे म्हणतात...


संभाजीराजे (Sambhajiraje Chatrapati) यांनी स्वराज्य संघटनेवरूनही भाष्य केले. ते म्हणाले की, गरीब, शेतकरी यांची स्वराज्य संघटना आहे. ही संघटना राजकारणात येणार यामध्ये काहीही दुमत नाही. स्वराज्य हे सुराज्य व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. शिवाजी महाराज यांनी जे सुराज्य केलं तसं दोन टक्के जरी काम करता आलं तर ते भाग्य आहे. नवी मुंबईत खूप मोठ्या जोरात सभा होणार आहे. लोकसभेसाठी नाशिक, संभाजीनगर, आणि आता कोल्हापुरातून देखील लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली जात असेल, तर चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण राज्यात जायचं असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्यांना सोबत यायचं आहे त्यांना घेऊन, आता तरी आम्ही एकटे चाललो आहोत. जे जे स्वतःच नेतृत्व घडवतात त्या सगळ्यांना राज्याचे नेतृत्व करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Jyotiraditya Shinde in Kolhapur : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; शिरोळ, हातकणंगले तालुक्यात संवाद साधणार