कोल्हापूर : फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक चेहरा असलेल्या भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. आज (23 ऑगस्ट) कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil on Samarjeetsinh Ghatge) समरजित यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे भाजपला सोडचिठ्ठी देणार याची चर्चा रंगली होती. त्यावर आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं आहे. 3 सप्टेंबर रोजी कागलमधील गैबी चौकामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे तुतारी फुंकणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली. 


गेले वर्षभर माझ्या मनामध्ये असलेली चिंता आज मिटली


3 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी केले. जयंत पाटील यांनी सांगितले की पवार साहेब कायम समरजित घाटगे यांच्या पाठीशी राहतील. त्यामुळे समरजित घाटगे यांचं लीड किती असणार ते मोजा. दोन महिन्यांमध्ये सरकार आपलंच येणार आहे तुम्ही काळजी करू नका. समरजित यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असे जयंत पाटील म्हणाले. गेले वर्षभर माझ्या मनामध्ये असलेली चिंता आज मिटली असून त्यामुळे मी आनंद व्यक्त करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे लोकसभेला तुम्ही दाखवून दिल आहे. आता विधानसभेला देखील दाखवून द्यायचं असल्याचं त्यांनी सांगितले. 


आम्ही टप्प्यात आले की कार्यक्रम करतो


महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकसंध म्हणून आपला निर्णय करावा, असे मी समरजित यांच्याशी बोललो असल्याचे जयंत पाटील म्हणाले. समरजित यांचे म्हणणे होते की आपण जेव्हा कोल्हापूरमध्ये याल तेव्हा आपण माझ्या कार्यकर्त्यांशी बोलले पाहिजे. त्यामुळे आम्ही टप्प्यात आले की कार्यक्रम करतो अशी टीका सुद्धा जयंत पाटील यांनी केली.  पाटील यांनी सांगितले की मी आजच येतो आणि कार्यकर्त्यांशी बोललो असं सांगितलं होत. 


कागलच्या गैबी चौकामध्ये पक्षप्रवेश होणार


त्यांनी सांगितले की, कागलमध्ये मी पूर्वी विक्रमसिंह राजे साहेब यांच्यासाठी आलो होतो. त्यावेळी शरद पवार यांनी विक्रमसिंह घाटगे यांना लोकसभेला उभं राहावं असं म्हटलं होतं. त्यावेळी राजेंनी काँग्रेसचा विचार कायम जपला होता. राजे गेल्यानंतर तुम्ही समरजित यांना जपलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर करायचा नाही, असं सांगितले आहे. त्यामुळे पुढील सभेत याबाबतीत बोलतो. मी स्वतः समरजित घाटगे यांच्या प्रवेशासाठी येणार असल्याचे शरद पवारांनी सांगितलं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे येत्या तीन सप्टेंबर रोजी कागलमध्ये समरजित यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. 


कागलच्या गैबी चौकामध्ये प्रवेश होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यांचा पक्षातील प्रवेश हा राज्याचा निकाल बदलणारा असल्याचं त्यांनी सांगितलं. या भूमीला राजर्षी शाहू महाराजांचा वारसा या भूमीला असून तो विचार वाचवला पाहिजे, यासाठी लोकसभेला शाहू महाराज उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता विधानसभेला देखील शाहू महाराजांचा विचार टिकवण्यासाठी समरजित यांना निवडून आणायचा असल्याचं जयंत पाटील यांनी आवाहन केलं.


इतर महत्वाच्या बातम्या