Raju Shetti on Dhairyasheel Mane : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी बंडखोर खासदार धैर्यशील मानेंविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यांनी आज ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला.  


ते म्हणाले की, मतदारांचा विश्वासघात केलेल्या धैर्यशील माने यांना मतदार धडा शिकवतील. मी त्यांच्या विरोधात लोकसभा लढवणार आणि जि़ंकणारही आहे. यावेळी त्यांनी स्वतंत्र असल्याचेही सांगितले. त्यांनी बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या मंत्र्यांवरही हल्ला चढवला. खरीप हंगामापूर्वी कृषी मंत्र्यांनी जबाबदारीने काम करायला हवे, पण आपले कृषीमंत्री हवापालटासाठी गुवाहाटीला गेले. महिना झाला, तरी राज्याला कृषीमंत्री मिळालेला नाही. 23 जिल्ह्यांतील 8 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले मात्र त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. सध्या राज्यात दोनच मंत्र्यांचे सरकार काम करत आहे. 


शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे


राजू शेट्टी यांनी ऊसाची एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय आगामी हंगाम सुरु होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. एफआरपीच्या पोटी अजूनही 1 हजार 536 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. ही एफआरपी व्याजासह शेतकऱ्यांना देण्यासाठी साखर आयुक्तांना केली असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारकडून एफआरपी दोन टप्प्यांमध्ये देण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले. 


राजू शेट्टी यांनी दोन टप्यात एफआरपीसाठी अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांकडूनव जोर जबरदस्तीने बोगस करार लिहून घेतले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर गायकवाड यांनी कोणत्याही शेतकर्यांबाबत असे प्रकार घडल्यास तातडीने माझ्याकडे तक्रारी द्यावेत. त्यावर तातडीने सुनावणी करून कारवाई केली जाईल,  तसेच ऑनलाईन काटे करण्यासाठी एक महिन्यात अहवाल सादर करू असे त्यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या