Satej Patil : शिवसेना फोडल्यानंतर भाजपशी युती करून सरकार स्थापन केलेल्या राज्यातील शिंदे सरकारचा अजूनही विस्तार झालेला नाही. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहावेळा दिल्ली दौरा करूनही मंत्रिमंडळ विस्तारावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.


राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आता विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार सतेज पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील, असा इशारा दिला आहे. किमान दोन्ही गटाचे चार पाच मंत्री करा, प्रशासकीय बदल्या अडकल्या आहेत, अनेक कामे प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. गोव्यासारखं महाराष्ट्रासारख्या राज्यात फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारभार चालवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.


भाजप आणि शिंदे दोन्ही गटाकडून घोडे अडले असावे


शिवसेनेत बंडखोरीत केलेल्या जवळपास 50 पैकी 40 आमदारांना मंत्रिपदावर दावा केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करण्यावरून घोडे अडल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप आणि शिंदे अशा दोन्ही गटांकडून घोडे अडले असावे, असे सतेज पाटील म्हणाले. किमान दोन्ही गटाचे चार पाच मंत्री करा, प्रशासकीय बदल्या अडकल्या आहेत, अनेक कामे प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. 


कोल्हापूर मनपासह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकांसाठी जिथं शक्य होईल, तिथे आघाडी करून, तर शक्य नाही त्या ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. आधार लिंक मतदार याद्या या महिन्याभरात पूर्ण झाल्यास निवडणुका सप्टेंबरपर्यंत होतील, असेही ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत सत्ता बदलाचा परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या