Kolhapur Police : कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरी करताना राजस्थानी गुंडांना कोल्हापुरी पाणी दाखवून दिले आहे. राजस्थानमध्ये बेछुट गोळीबारात खून करून फरार झालेल्या पाच जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून काल पकडले. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या पाच जणांच्या टोळीने गोळीबार करून खून केल्याची कबूली दिली आहे. 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून राजस्थानमधील भरतपूरमध्ये गोळीबार करून एकाचा खून करून फरार पाच जणांची टोळी फरार झाली होती. या टोळीला कागल पोलिसांनी सापळा रचत मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण, पेठवडगाव आणि कागल पोलिसांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीने टोळी जेरबंद झाली. 


भरतपूरमध्ये 4 सप्टेबर गोळीबार करून एकाचा 10 जणांनी खून केला होता. या खुनानंतर पाच जण फरार झाले होते. हे पाच जण कोल्हापूरहून गोव्याकडे जात असून त्यांच्या हत्यारे असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांना मिळाली होती. त्यानंतर कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजितकुमार जाधव यांना कोगनोळी टोल नाकाबंदी करून तपासणी करण्याचे आदेश दिेले. त्यानुसार जाधव यांनी तातडीने कोगनोळी टोल नाका गाठत नाकाबंदी केली आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरु केली.


एमपी 09 सीक्यू 3724  या नंबरच्या स्विफ्ट डिझायरची तपासणी सुरु करताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र,  जाधव व त्यांच्या पथकाने त्यांना शिताफीने उचलत पोलिस ठाण्यात आणले. गाडीची झडती घेतली असता बेसबॉलची बॅट आढळली. संशयितांनी रिव्हॉल्वर व गावठी कट्टा अशी चार हत्यारे राजस्थानमध्येच एका ठिकाणी ठेवल्याचे सांगितले.


बिश्नोई गँगलाही कोल्हापूरमध्ये पकडले होते


यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कर्नाटकातील हुब्बळी येथे चकवा देऊन फरार झाल्यानंतर किणी टोल प्लाझा येथून पुण्याला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिष्णोई टोळीतील तीन वाँटेड गुन्हेगारांना पकडले होते. किणी टोल प्लाझा येथे झालेल्या चकमकीदरम्यान, क्रॉस फायरिंगमध्ये दोन गुन्हेगार जखमी झाले होते. जे राजस्थान पोलिसांना जमले ते कोल्हापूर पोलिसांनी करून दाखवले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या