Rajaram Sakhar Karkhana : गेल्या अनेक आरोप प्रत्यारोपांचा केंद्रबिंदू ठरलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीला आजपासून (20 मार्च) सुरु होत आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 25 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या आणखी रंगणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी कट्टर राजकीय वैर असलेल्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटामध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे सत्तांतर होणार की, महाडिक पुन्हा एकदा सत्ता काबीज करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

  


सर्वसाधारण गटातील 15, महिला प्रतिनिधी गटातील 2 तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था गटाचे 129 तर 13409 अ वर्ग सभासद असे 13538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. दुसरीकडे, सभासदांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधारी महाडिक गटाला दिलासा दिला. दरम्यान, निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार, 12 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. आजपासूनच ( 20 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. 


गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक लांबणीवर 


दरम्यान, राजारामच्या विद्यमान संचालकांची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक पुढे ढकलली होती. त्यानंतर कारखाना सभासदांवरून झालेला न्यायालयीन लढा झाला. यामध्येही काही कालावधी निघून गेला. सभासदांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर 9 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर दोन दिवसांमध्ये राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.


राजकीय समीकरणे कशी असणार? 


कारखान्याची लढत थेट पाटील आणि महाडिक गटामध्ये होत असली, तरी करवीर आणि हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक सभासद असल्याने या दोन्ही तालुक्यातील आजी माजी आमदारांची भूमिकाही महत्वाची असणार आहे. कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत पी. एन. पाटील गटाला धक्का बसल्याने राजाराम कारखान्यात ते महाडिकांसोबत ताकदीनेर राहतील अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, आमदार विनय कोरेही महाडिकांसोबत राहतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे प्रकाश आवाडेही त्यांच्यासोबत राहतील असे दिसते.सतेज पाटील यांना गोकुळमध्ये आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, माजी आमदार डाॅ. सुजित मिणचेकर, कुंभीचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी साथ दिली होती. त्यामुळे या ठिकाणी त्याच पद्धतीने साथ मिळणार का? याचीही उत्सुकता आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :