Kolhapur Expansion : कोल्हापूर शहराची अवस्था दिवसागणिक तोळामासाची होत चालली असताना आणि हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत आवश्यक असताना राजकीय समन्वयाअभावी परस्थिती चिघळत चालली आहे. 


कोल्हापूर शहराला लागून असलेल्या अनेक गावांनी हद्दवाढीला विरोध केला आहे. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहर असा संघर्ष अधिकच पेटत चालला आहे. आता हद्दवाढीला विरोध करणाऱ्या उचगाव ग्रामस्थांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून शहर हद्दवाढीला विरोध दर्शवला आहे.


उचगाव हे कोल्हापूर शहराच्या नजीक असलेलं सगळ्यात मोठं गाव आहे. मात्र उचगावने आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शहरात समाविष्ट होणार नसल्याची भूमिका घेतली आहे. काही व्यावसायिक आणि बिल्डरांसाठी हद्दवाढीचा घाट घातला जात असल्याचे म्हणणे उचगावच्या ग्रामस्थांचे आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा तिढा सुटण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचा होत आहे. 


कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीने बोलवलेल्या बैठकीकडे राजकीय नेत्यांची पाठ


दुसरीकडे कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीने रविवारी बोलावलेल्या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. कोल्हापूर हद्दवाढीचा निर्णय त्यांना विचारात न घेता घेण्यात येऊ नये, यासाठी विरोधी कृती समितीकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.


रविवारी हद्दवाढविरोधी समितीने बैठक बोलावली होती. मात्र, मतदारसंघातील राजकीय गणितांचा विचार करत राजकीय नेते या विषयावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. हद्दवाढ विरोधी कृती समितीने खासदार, आमदार आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रणे पाठवली होती. मात्र, बैठकीला कोणीही हजर झाले नाही.


विरोधी कृती समितीचे राजू माने यांनी सांगितले की, आम्हाला ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळत आहे. हद्दवाढ कृती समितीचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. या बैठकीला हद्दवाढीत असणाऱ्या गावांचे सरपंच उपस्थित होते. त्यांनी सार्वजनिकपणे सांगितले की, त्यांनी ग्रामस्थांना सेवा पुरविण्यात लक्षणीय प्रगती केली आहे आणि म्हणूनच हद्दवाढ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. लवकरच, आम्ही पुन्हा भेटून आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. 


इतर महत्वाच्या बातम्या