कोल्हापूर : जगभरातील मराठीजनांकडून आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. गर्जा महाराष्ट्र, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... असे म्हणत महाराष्ट्र दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Kolhapur) येथे एका विशेष शैक्षणिक व समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यापीठातील सुजित अर्जुन मुंढे लिखित ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ या पुस्तकाचे (Police) प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्याहस्ते करण्यात आले. या समारंभास प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. अभयसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ.एस.एम.देशमुख, विधी अधिविभाग प्रमुख डॉ.व्ही.वाय.धूपदाळे, सुदर्शन देसाई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना कुलगुरू शिर्के यांनी मुंढे यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.  “समाजात कायद्याचे महत्त्व, त्याचे आकलन आणि अंमलबजावणी या प्रक्रियेत जनतेचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे. त्यासाठी संशोधनाधारित व अभ्यासपूर्ण साहित्याची आवश्यकता आहे. कायदे काळानुसार बदलतात, म्हणून फक्त फौजदारी नव्हे, तर शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कायद्यांचा सुद्धा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. विशेषतः विद्यापीठ कायद्यांवरही संशोधन व सूचना व्हाव्यात.” असे त्यांनी म्हटले. 

लेखक सुजित मुंढे यांनी  सांगितले की, “पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील संबंध अधिक प्रभावी होण्यासाठी कायद्याची अचूक व सुलभ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. या पुस्तकात 1 जुलै 2024 पासून देशभरात लागू होणाऱ्या भारतीय न्याय संहिता 2023 आणि जुन्या भारतीय दंड संहिता 1860 यामधील महत्त्वाच्या बदलांचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. याशिवाय, CCTNS (Crime and Criminal Tracking Network System) प्रणाली आणि विविध राज्य/केंद्रशासित पोलीस पोर्टल्सवरील नागरिक सेवा यांचा आढावाही ग्रंथात घेतला आहे. हे पुस्तक नागरिक, विद्यार्थी, अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरेल.” असे मुंढे यांनी म्हटले. 

कायदा साक्षरतेसोबतच डिजिटल सक्षमीकरणास चालना

मान्यवरांनी या पुस्तकाचे कौतुक करताना नमूद केले की, यामध्ये कायदा, प्रशासन आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे कायदा साक्षरतेबरोबरच नागरिकांची जबाबदारी, पोलीस प्रशासनातील पारदर्शकता आणि डिजिटल सक्षमीकरण यास चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कार्यक्रमास विद्यापीठातील विविध अधिष्ठाते, विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, उत्साही व ज्ञानवर्धक वातावरणात पार पडला.

हेही वाचा

दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती