Kolhapur News : आंतरजिल्हा बदलीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील शिक्षकांनी बिंदुनामावलीमधील त्रुटींवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून बिंदुनामावलीमध्ये प्रवर्गनिहाय झालेले बदलाची माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून 6 ऑगस्टपर्यंत सादर करण्यात आले नाही, तर 8 ऑगस्टपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील शिक्षकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 


2017 पासून मंजूर करण्यात आलेल्या बिंदुनामावलीमध्ये प्रवर्गनिहाय बदल तसेच खुल्या प्रवर्गातील अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी अगर जास्त करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत माहिती द्यावी अशी मागणी आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी केली आहे. गेल्या 15 वर्षात खुल्या प्रवर्गाची मोठी भरती झाली नसतानाही व दर वर्षी 100 ते 200 च्या आसपास शिक्षक सेवानिवृत्त तसेच पदोन्नती होत असताना एक खुला प्रवर्ग अतिरिक्त होण्याची गौडबंगाल काय? अशी विचारणा शिक्षकांनी केली आहे. 


बिंदुनामावली वस्तुनिष्ठ पद्धतीने अद्ययावत होत नसल्याने अजूनही खुला प्रवर्ग अतिरिक्त असल्याचे दिसते. बिंदुनामावली वस्तुनिष्ठपणे अद्यावत करून रिक्त पदांचा अहवाल तयार केला गेल्यास जवळपास शंभर ते दोनशे शिक्षक खुल्या प्रवर्गातून बदली करून कोल्हापूरमध्ये येऊ शकतात, असा दावा या आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील  शिक्षकांनी केला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या