Kolhapur News : सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी (old pension scheme) संप पुकारल्याने विरोधातील आणि समर्थनातील  प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियात सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरल्याने संतप्त  प्रतिक्रिया उमटत आहेत. संपाची जाहीरपणे खिल्ली उडवली जात असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, कोल्हापुरात (Kolahpur News) सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगारांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेली नाही. 


काय म्हटले आहे व्हायरल पोस्टमध्ये?


जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा! आम्ही तयार आहोत. अर्ध्या पगारावर काम करायला.. ते ही विना पेन्शन... सुशिक्षित बेरोजगारांचा युवक युवतींचा भव्य मोर्चा. जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण मोर्चात सहभागी होऊया. उद्या (17 मार्च) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी दसरा चौकात हजर राहावे, असेही आवाहन यामधून करण्यात आले आहे. मी येतोय, तुम्हीही या.. यायला लागतंय असाही उल्लेख करण्यात आला आहे.




कोल्हापूर मनपा कर्मचारी संपातून बाहेर


दरम्यान, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनला दिलं आहे. त्यामुळे राज्यभरातील महापालिकेतील कर्मचारी आजपासून (16 मार्च) राज्यव्यापी संपातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर मनपा कर्मचारी (Kolhapur Municipal Corporation) आजपासून कामावर रुजू होणार आहेत. 


मात्र ते काळ्याफिती लावून काम सुरु करतील, असे पत्र फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे आम्हीही कामावर रुजू होऊ, अशी माहिती कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुंद्रे, सरचिटणीस दिनकर आवळे, अजित तिवले यांनी दिली आहे.


कचरा उठावासाठी खासगी कर्मचारी 


दुसरीकडे, कोल्हापूर महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याने मनपा प्रशासनाकडून टिप्परसाठी, ड्रेनेज लाईनसाठी तसेच 81 प्रभागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे 351 असे खासगी एजन्सीकडून कर्मचारी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून कचरा उठावासह भागातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. सध्या मनपाकडे 200 रोजंदारी कर्मचारी आहेत. प्रशासनाने कर्मचारी संघाला ‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबतचे पत्र दिले होते, पण ते कामावर हजर झाले नसल्याने कचरा व सफाईचे काम दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिले. त्यामुळे कंत्राटी चालकांकडून टिप्परमधून कचरा उठावाचा प्रयत्न झाला. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पावरही टिप्परमधून कचरा काढण्यासाठी 10 कंत्राटी कर्मचारी नेमले होते. रोजंदार कर्मचारी कामावर आले नसल्याने प्रशासनाने खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेण्याचे नियोजन केले आहे. त्यात 169 टिप्परसोबत 169 सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


इतर महत्वाच्या बातम्या