Sharad Pawar In Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वंचित बहुजन आघाडीवर भूमिका स्पष्ट केली. आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा केलेली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते म्हणाले की,आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. मात्र, आमची वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. ते म्हणाले की तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. 


पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार म्हणतात


एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय रणकंदन माजले आहे. त्यामुळे याबाबत त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेले आहेत. त्यामुळे आता तो प्रश्न कशाला काढायचा. 


सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत 


एका सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला राज्यामध्ये 34 जागा मिळणार असल्याचा अंदाज दाखवण्यात येत आहे. ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत आहे असेच सर्व्हेमधून दिसत आहे. कर्नाटकमध्ये भाजप राहिल की नाही अशीच चिन्हे आहेत. दरम्यान, त्यांनी विरोधकांच्या एकीवर भाष्य केले. ते म्हणाले की, विरोधकांच्या एकीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अजूनही कोणताही निर्णय या संदर्भात झालेला नाही. प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या अगोदर सोडवाव्या लागतील. विरोधकां एकीबाबत दिल्लीमध्ये डायलॉग सुरू होईल. 


तपास यंत्रणांचा गैरवापर 


त्यांनी सांगितले की, ममता यांच्या सत्ताधाऱ्यांविरोधातील विरोध अजूनही कमी झालेला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात नसल्याचे म्हणत मोदी यांची पाठराखण केली होती. मात्र, त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक प्रकारे अप्रत्यक्ष टोला लगावताना नेत्यांमागे तपास यंत्रणा लावल्या जात असल्याचा आरोप केला.


कोणाला पत्र लिहणार माहित नाही 


ते म्हणाले की, तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. दरम्यान, त्यांनी पुण्यामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले की, पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील कोणाला पत्र  लिहणार आहेत माहीत नाही. कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक झाली नव्हती का? पंढरपूरमध्ये झाली नव्हती का? आत्ताच कसे यांना सुचले कळत नसल्याचे ते म्हणाले. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, आमच्यामध्ये संवाद असल्याने काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या