Kolhapur Rain Update : तब्बल गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्णत: दडी मारलेल्या मान्सूनने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या सरीवर सरींमुळे जिल्ह्यातील उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.


गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने सोयाबीन तसेच भुईमूग पिकाला विशेष करून जीवदान मिळाले आहे. शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्याचबरोबर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या होत्या. त्यामुळे हाताला आलेली उभी पिके जातात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.


जिल्ह्यातील पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, तसेच भुदरगड या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रांमध्ये जोरदार वृष्टी झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर शहरामध्ये हीगेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, पाऊस परतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. लावणी योग्य पाऊस झाल्याने आडसाल ऊस लावणीसह भाताच्या रोप लावणीला वेग आला आहे.