Kolhapur News: राज्य सरकारने धनगर समाजाचे काही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यापैकी धनगर समाजातील नागरिकांना अनुसूचित जमाती प्रमाणे विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ मंजूर केला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवीच्या कार्याचा आढावा सादर करणाऱ्या मिरवणुकीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते कोल्हापुरात मिरजकर टिकटी येथून करण्यात आला. 


केसरकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मिरवणूक रथातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्याचा आढावा सादर करण्याऱ्या मिरणुकीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी समाजातील पदाधिकाऱ्यांनी धनगर समाजातील विविध मागण्यांचे निवेदन सादर करत मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल आभारही मानले. केसरकर म्हणाले की, सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील योजना लागू केल्या आहेत. त्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून समाजातील सर्वसामान्य नागरिकाला त्याचा लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराविषयी व सामाजिक व धार्मिक कार्याविषयी केसरकर यांनी माहिती दिली. अहिल्यादेवींचा सर्वसामान्य जनतेसाठी केलेला राज्य कारभार हा संपूर्ण देशभरात आदर्शवत असाच होता. त्याप्रमाणे अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केसरकर व उपस्थित मान्यवरांनी स्वतः धनगरी ढोल वाजवत अहिल्यादेवी यांच्या कार्याची माहिती सादर करणाऱ्या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी धनगर समाज बांधवांसह राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे व धनगर समाजाचे मान्यवर उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या