MVA Vajramuth Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय तडकाफडकी जाहीर केल्यानंतर आता राजकीय पडसाद महाविकास आघाडीमध्येही उमटू लागले आहेत. महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभेच्या माध्यमातून भाजपवर कडाडून प्रहार सुरू होता. या सभा आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर त्यानंतर राज्याची उपराजधानी नागपूर आणि त्यानंतर राजधानी मुंबईमधील बीकेसी मैदानात पार पडली. आता हे सर्व सुरळीत सुरू असतानाच शरद पवार यांनी घेतलेले निर्णयाने महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे राजकीय वादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे आता आगामी ठरवण्यात आलेल्या सभांच्या कार्यक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 


वज्रमूठ सभा होणार की नाही? अशी चर्चा होत असताना महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून दावे, प्रतिदावे केले जात असल्याने संभ्रमावस्था वाढली आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून संभ्रमावस्था वाढत चालली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार 14 मे रोजी पुण्यामध्ये व्रजमूठ सभा होणार होती. त्यानंतर 28 मे रोजी कोल्हापुरात होणार होती. 3 जून रोजी नाशिकमध्ये होणार होती, तर त्यानंतर 11 जून रोजी अमरावतीमध्ये होणार होती. मात्र, या सभा रद्द झाल्याची माहिती जवळपास समोर येत आहे. मात्र या रद्द करण्यावरून अधिकृत वक्तव्य समोर आलेल नाही. नेत्यांमधील मात्र विरोधाभास दिसून येत आहे. 


वज्रमुठ सभेवरून कोण काय म्हणाले?


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तारखा पुढे ढकलण्यासाठी चर्चा झाली होती, असे म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभा होतील की नाहीत? हे सांगता येणार नाही हे सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. दुसरीकडे, प्रफुल पटेल यांनी मात्र सभा स्थगित झाल्याचे सांगत कुठल्याही प्रकारे सभा रद्द झाल्या नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, की मे महिन्यातील उन्हाळा पाहता आम्ही मुंबईमधील सभा पार पडल्यानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. याला राष्ट्रवादीमधील घडामोडींचा काही संदर्भ नाही.   


पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना आगामी सभा रद्द झाल्यात जमा असल्याचे म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुण्यामधील सभेवरून थोडी साशंकता असल्याचे सांगत 28 मे रोजी कोल्हापूरमधील सभा होणार असल्याचा दावा केला. त्यामुळे तीन पक्षातील चार नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सभा होणार की नाही? याची संभ्रमावस्था कायम आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या