कोल्हापूर : गेल्यावर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा गर्भित इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आगामी लढाईसाठी रणशिंग फुंकले आहे. दरासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरातून (Kolhapur News) त्यांनी केली. आगामी आंदोलनाची रणनीती कशी असेल? या संदर्भातील माहिती राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांवर पायी जाणार आहे. 22 दिवस हे आंदोलन सुरू असेल, असेही  शेट्टी यांनी जाहीर केले. 


आजपासून साखर कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नाही


राजू शेट्टी यांनी सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. या दरम्यान साखर कारखान्यांवर पायी 522 किलोमीटर चालून आत्मक्लेश करण्यात येईल. स्वाभिमानी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, शेट्टी यांनी आजपासून साखर कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी वाहतूक करणाऱ्या बांधवांना सुद्धा वाहतूक करू नये असे आवाहन केलं आहे. आंदोलन झाल्यास होणाऱ्या नुकसानीसाठी ते स्वतः जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला. गेल्यावर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. यावर्षी साखरेच्या दराचे आंदोलन गांधीगिरीच्या मार्गाने करणार आहे. आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 17 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांवर पायी जाणार आहे. 22 दिवस हे आंदोलन सुरू असेल. 


कर्नाटकातही स्वाभिमानीकडून आंदोलन 


कर्नाटकातील साखर कारखान्याना देखील तोच नियम लावणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. 10 ऑक्टोबर रोजी कर्नाटकात देखील आमचं आंदोलन असणार असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचं आणि कर्नाटक रयत संघाचे आंदोलन असणार असल्याची त्यांनी सांगितले. 


प्रत्येक कारखान्याच्या दारात ढोल बजाओ आंदोलन


दुसरीकडे आज (2 ऑक्टोबर)  कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रत्येक कारखान्याच्या दारात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद साखर कारखान्यावर ढोल बजाओ आंदोलन करून 400 रूपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. ऊस निर्यातबंदी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. आता गेल्यावर्षीच्या तुटलेल्या ऊसाच्या हिशेबावरून स्वाभिमानीने साखर कारखान्यांना धारेवर धरले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या