Murlidhar Jadhav : शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केलेल्या मुरलीधर जाधव यांना अश्रू अनावर झाले. 19 वर्षे पक्षासाठी काम केलं पण मला पदावरून पायउतार केलं. माजी आमदार सुजित मिणचेकर हे पदमुक्त करण्यासाठी काम करत होते, असा घणाघाती हल्ला मुरलीधर जाधव यांनी चढवला. जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. भावना माध्यमांसमोर मांडल्या तर काय चूक केली? असा सवालही त्यांनी केला. 


मुरलीधर जाधव म्हणाले की, पक्ष संकटात असताना सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र मी दिले. माझ्या मुलासह पत्नी आणि सगळ्यांची प्रतिज्ञापत्र सादर केली. असं असताना जर माझ्यावर कारवाई केली याचे दुःख वाटतं, मला किमान बोलवून तरी चूक सांगायला पाहिजे होतं. शिवसेना या चार अक्षराच्या पक्षाने मला मोठं केलं. मी उद्धव ठाकरे किंवा पक्षाबद्दल काहीही वाईट बोलणार नाही. माझ्या पक्षाचे चिन्ह आणि नाव टिकू दे यासाठी दिवस रात्र काम केलं. 


पण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन भेटलो


एमआयडीसीमधील जागेवरूनही मुरलीधर जाधव यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, उद्योगमंत्री उदय सामंत यांना मी भेटलो, पण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन भेटलो. मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा एमआयडीसीमधील एक कोटीचा प्लॉट काढून घेतला, तरीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला. एमआयडीसीमध्ये कोट्यवधींचा भूखंड घोटाळा आहे. त्यामध्ये माजी आमदार सुजित मिनचेकर यांची टोळी काम करते. सुजित मिनचेकर यांनी सांगितले की मुरलीधर जाधव यांचा प्लॉट काढून घ्या म्हणजे शिंदे गटात येतो असं शिंदे गटाला सांगितले. पक्षाने घेतलेला निर्णय वेदना देणारा आहे. 


तर हे मिणचेकर काय दिवे लावणार?


मुरलीधर जाधव यांनी सर्वाधिक हल्लाबोल सुजित मिणचेकरांवर केला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीमधून तिकीट मिळालं तर हे मिणचेकर काय दिवस लावणार? कालपासून माझं मानसिक संतुलन बिघडलं आहे. साहेबांनी या नेत्यांचं ऐकून निर्णय घेतलाच कसा असा प्रश्न पडला आहे. मला गोकुळ सोडलं तर काय दिलं सांगा. संजय पवार आज तुम्ही सुपात आहात मी जात्यात आहे, पण पवार साहेब तुम्ही देखील जात्यात याल. 


इतर महत्वाच्या बातम्या