Kolhapur Municipal Corporation : केंद्र सरकारकडून 50 इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यासाठी केएमटीकडून (Kolhapr KMT) प्रस्ताव देण्यात आला आहे. खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या माध्यमातून ई-बस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दिलेल्या प्रस्तावाकडे कोल्हापूर मनपा प्रशासनाचे (Kolhapur Municipal Corporation) लक्ष लागले आहे. एकूण केलेल्या मागणीपैकी किमान काही बसेस उपलब्ध झाल्या, तरी ई-बससाठी सुविधा निर्माण होऊन भविष्यात आणखी बसेस घेण्याची संधी मिळेल. 


दरम्यान, केएमटीकडून यापूर्वी ई-बससाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पण, त्यावर काही निर्णय झालेला नाही. सध्या केएमटीची अवस्था वाईट असल्यानं बसची संख्या वाढवणं आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर खासदार महाडिक यांनी प्रस्ताव देण्यास केएमटी प्रशासनाला सांगितले होते. त्यानुसार केएमटीने 50 इलेक्ट्रिक बसचा प्रस्ताव धनंजय महाडिकांकडे दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या प्रस्तावाबाबत प्रयत्न करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी म्हटले आहे. 


तत्पूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळीही बससाठी प्रयत्न केला जाणार आहे. मागणी केलेल्या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात किमान काही बस उपलब्ध झाल्या तर अंबाबाई तीर्थक्षेत्राच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांसाठी काही ई बस वापरता येऊ शकतील.


परिवहन व्यवस्थापक टीना गवळी प्रशासकांकडून धारेवर 


प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केएमटीच्या गैरव्यवस्थापनासाठी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांना जबाबदार धरले आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, तोट्यातील मार्ग बंद करणे, अंदाजपत्रकाची अंमलबजावणी असमाधानकारक आदी बाबींवर बोट ठेवत पत्र दिले आहे. गवळी यांचे नियंत्रण नसल्याचे दिसत असल्याने विविध कामांबाबत आराखडा करून त्याची अंमलबजावणी करावी, तसेच त्यांना 24 तासांमध्ये अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.


एकाच आठवड्यात दोनवेळा केएमटीचा अपघात 


दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये मध्यवर्ती बस स्थानकाजवळ एका बसचे चाक निखळून पडले होते. त्यानंतर बिंदू चौकात आणखी एका बसच्या इंजिनमधून धूर आला होत. केएमटी बसेसच्या होणाऱ्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने बसेस अनेक ब्रेकडाऊन झाल्या आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे. एकेकाळी केएमटीचे 80 हजार प्रवासी आणि केएमटीच्या 100 बसेस सेवेत होत्या. किमान एका मार्गावर दर अर्ध्या तासाने केएमटी दिसून येत होती. मात्र, आता परिस्थिती बिकट झाली आहे. सद्यस्थितीमध्ये केएमटीकडे 60 बसेस आहेत, त्यामधील केवळ 40 धावत आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Kolhapur News : जवान सुरज पवार यांचे कर्तव्यावर असताना निधन; कुटुबीयांकडून विधवा प्रथा बंदीचा क्रांतीकारी निर्णय