Kolhapur News : रेल्वे अर्थसंकल्पांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अमृत भारत योजनेचा भाग म्हणून पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांच्या यादीत कोल्हापूर, मिरज, सांगली आणि सातारा (railway stations of Kolhapur, Miraj, Sangli, Satara) या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने कोल्हापूर आणि मिरज स्थानकांना मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्याची घोषणा केली होती. 

Continues below advertisement

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 2.41 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये सुमारे 2,800 किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्यमान रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि नवीन रेल्वे लाईन टाकणे यांचा समावेश आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील 1,275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मिरज जंक्शन हे पुणे विभागातील पुण्यानंतरचे दुसरे सर्वाधिक महसूल देणारे स्टेशन आहे. पुनर्विकासांतर्गत मिरज स्थानक व फलाटांची सुधारणा, सर्व फलाटांची लांबी, रुंदी व उंची वाढविणे, पिट लाइनचे रखडलेले काम सुरू करणे, टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

या स्थानकांचा होणार पुनर्विकास 

पुणे रेल्वे विभागांतर्गत मिरज, पुणे, कोल्हापूर, सातारा, चिंचवड, सांगली, कराड, हडपसर, बारामती, लोणंद, आकुर्डी, तळेगाव, हातकणंगले, वाठार, देहूरोड, उरळी, केडगाव आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेत समावेश करण्यात आला आहे.

Continues below advertisement

मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी म्हणाले की, “देशभरात सुमारे 400 वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील. महाराष्ट्रात शिर्डी-मुंबई आणि सोलापूर-मुंबई मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू होत आहेत. त्याच मार्गावर कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील वंदे भारत रेल्वेही सुरू होणार आहे. मुंबई-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे ही ट्रेन पूर्ण क्षमतेने कमी वेळेत सुरू होऊ शकते.

फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल म्हणाले, “कोल्हापूर-मुंबई रेल्वे मार्गावर पर्यटन, व्यापार, उद्योगासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. कोरोना महामारीपूर्वी कोल्हापूर ते मुंबई दरम्यान तीन गाड्या धावत होत्या. आता महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेस या दोनच गाड्या धावत आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेस धावण्यास 11 तास लागतात तर वेळेचा विचार केल्यास कोयना एक्स्प्रेस फारशी सोयीची नाही. याउलट रस्त्याने सहा ते सात तास लागतात. त्यामुळे या मार्गावर दुरांतो किंवा सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी आणि बंद असलेली सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी”.

इतर महत्वाच्या बातम्या