कोल्हापूर: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने घरात झालेल्या वादानंतर पत्नीचा निर्घृणपणे खून (Kolhapur Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीचा खून केल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये फोन करून माहिती दिल, या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. आर्थिक वादातून उद्भवलेल्या कडव्या भांडणात एका फौंड्रीत काम करणाऱ्या पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने गळा कापून अत्यंत निघृण पद्धतीने खून केल्याची धक्कादायक घटना 5 ऑगस्टच्या मध्यरात्री महालक्ष्मीनगर, आपटेनगर परिसरात घडली. आरोपीचे नाव परशराम पांडुरंग पाटील (वय 44) असे असून, त्यानेच 112 नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली आहे.(Kolhapur Crime News) 

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशराम पाटील हे मूळचे राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील असून, ते सध्या महालक्ष्मीनगर येथे पत्नी अस्मिता (वय 44), दोन मुले आणि वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होते. ते उद्यमनगरमधील फौंड्रीत काम करत होते.घटनेच्या रात्री, त्यांची मुले बाहेर होती आणि वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. तेव्हाच परशराम आणि अस्मिता यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात परशरामने पत्नीचा गळा दाबून बेशुद्ध केले, त्यानंतर घरातल्या चाकूने गळा कापून तिचा खून केला. नंतर त्यांनी स्वतःहून पोलिसांना फोन करून घटनेची कबुली दिली.

वादाचा मूळ कारण काय?

परशरामच्या सांगण्यानुसार, काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःचं घर विकलं होतं. त्यातून मिळालेली रक्कम, इतरांकडून घेतलेले हातउसने पैसे आणि मुलांच्या नावावर फायनान्स कंपनीतून घेतलेलं प्रत्येकी एक लाख रुपयांचं कर्ज याची स्पष्ट माहिती अस्मिता देत नव्हती. याच कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. मंगळवारी रात्री अशाच एका वादात ही दुर्दैवी घटना घडली.

रागात घर झालं उध्वस्त, मुलं झाली पोरकी

या घटनेनंतर पाटील दाम्पत्याची दोन मुलं मानसिकदृष्ट्या हादरली आहेत. आईचा मृत्यू आणि वडील तुरुंगात या दुहेरी धक्याने कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने मुलांनी बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कार केले. तर करवीर पोलिसांनी परशराम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे महालक्ष्मीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती

करवीर पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पाटील मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील रहिवासी आहे. पत्नी, दोन मुले, वडिलांसह तो महालक्ष्मीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतो. तो उद्यमनगरात फौंड्रीत काम करतो. मोठा मुलगा खासगी नोकरी करतो, तर लहान मुलगा शिकत आहे. घरामध्ये सुरू असलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना पाच वर्षापूर्वी स्वतःच्या मालकीचं घर विकावं लागलं. हे कुटुंब महालक्ष्मीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहायला आलं, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाटील दाम्पत्यामध्ये पैशांवरून वाद झाला. त्यावेळी दोन्ही मुले बाहेर गेली होती, तर वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. रागाच्या भरात पाटीलने पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पत्नीचा घरातील चाकूने गळा कापला. पत्नीचा खून केल्यानंतर मोबाइलवरून 112 नंबरवर पोलिसांना फोन केला.