sammed shikharji : झारखंडमधील जैन धर्मियांचे पवित्रस्थळ असलेल्या सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज जैन समाजाकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण होत आहेत या ठिकाणी काही निंदनीय प्रकार घडत आहेत, या सर्वांचा प्रतिबंध करावा यासाठी  मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 


जैन धर्माचे पावन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी क्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित केले असून तो निर्णय मागे घ्यावा याबाबत सकल जैन समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चाच्या नियोजनावर चर्चा झाली. दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. हा मोर्चा बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी, पापाची तिकटी,  शिवाजी मार्केट, लक्ष्मीपूरी, व्हीनस कॉर्नर अस्बेंली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. यानंतर प्रत्येक मंदिरांचे अध्यक्ष महास्वामी समाजातील मान्यवरांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. सर्व जैन धर्मियांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. (sammed shikharji)


जैन धर्मियांच्या सर्व तीर्थक्षेत्रांना संरक्षण तसेच तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करत नाही तोपर्यंत जैन समाज धर्मात आंदोलन सुरूच राहील. या मोर्चानंतर केंद्र सरकारने जर मागणी मान्य केले नाही, तर टप्प्याटप्प्याने मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात येईल. पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही निवेदन देण्यात येईल असे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले. (sammed shikharji)


सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ करू नका 


दरम्यान, सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित झाल्याने देशभरातून मोर्चे सुरुच आहेत. सम्मेद शिखरजी हे धार्मिक स्थळ असल्याचे जैन धर्मियांची भावना आहे. त्याचे पर्यटन स्थळात रूपांतर करता येणार नाही. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून जैन धर्माचे पवित्र स्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला तीर्थक्षेत्र दर्जा राहावे यासाठी, अशी मागणी केली आहे. 


त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, हे प्रकरण जैन समाजाच्या भावनांशी निगडित आहे. हे लक्षात घेऊन या विषयाचा फेरविचार व्हायला हवा. पर्यावरण मंत्रालयाने हे वन्यजीव अभयारण्य घोषित करून ते इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये ठेवले आहे. त्याचवेळी झारखंड सरकारने (सोरेन सरकार) याला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. काही काळापासून या भागात मांसाहार आणि दारूचे सेवन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. जैन धर्मियांचे हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने या परिसराचे पावित्र्य धोक्यात येईल, असे जैन धर्मीयांचे मत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या