Almatti dam Height : कर्नाटक सरकारकडून कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत हालचाल सुरु असल्याने राज्य सरकारने अहवाल तयार केल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar on Almatti Dam Height) यांनी दिली. हा अहवाल कर्नाटक सरकारसोबत शेअर केला जाईल आणि धरणाची उंची न वाढवण्यासाठी विनंती केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. अलमट्टी धरणाची 519 वरून 524 मीटर करण्यासाठी प्रत्यक्ष तांत्रिक सल्लागाराची निविदा प्रसिद्ध झाल्याने महाराष्ट्राची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी माहिती दिली. (Almatti dam Height)

  


कृष्णा नदीवर कर्नाटकने बांधलेल्या अलमट्टी धरणातील पाणी पातळीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला आतापर्यंत मोठा फटका बसला आहे. 2005 मध्ये अभूतपूर्व असा महापूर आला होता. 2010, 2015, 2019 आणि 2021 मध्येही महापूर आला. पुरामुळे लाखो हेक्टरवरील पीक नष्ट झाले होते. शिवाय हजारो लोक बेघर झाले होते. 


Almatti dam Height : उंची न वाढवण्याची विनंती करू


धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या योजनेवर बोलताना केसरकर म्हणाले की, “राज्य सरकारने अलमट्टीच्या पुराच्या परिणामाचा अहवाल तयार केला आहे. आम्ही तो कर्नाटकला देऊ आणि धरणाची उंची न वाढवण्याची विनंती करू. गेल्या काही वर्षांत आम्ही दोन्ही राज्यांमध्ये चांगला समन्वय पाहिला आहे, ज्यामुळे महापूर टळला आहे. आमच्या बाजूच्या नद्या चिंताजनक पातळीवर पोहोचल्यानंतर कर्नाटकने धरणातून पाणी सोडले आहे.” (Deepak Kesarkar on Almatti Dam Height)


कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढवणार आहे. नुकतेच कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकारला उंची वाढवू नये अशी विनंती करेल आणि तसा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकार कर्नाटकला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल.


Almatti dam Height : ऑगस्टअखेर 519.64 मीटर पाणीपातळी ठेवण्याची मर्यादा


अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर इतकी वाढवण्यासाठी कर्नाटकला कृष्णा पाणी वाटप लवाद-2 कडून परवानगी मिळाली आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणात सांगली, कोल्हापूर महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या मुकुंद घारे समितीने अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा उल्लेख केला आहे. या धरणात ऑगस्टअखेर 519.64 मीटर पाणीपातळी ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेचे उल्लंघन झाल्याने 2005 मध्ये सांगली आणि कोल्हापुरातील महापूर स्थिती भीषण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या