Shivsena Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें गटाच्या शिवसैनिकांची कथित बनावट प्रतिज्ञापत्रावरून चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेचे चौघांचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. या पथकाकडून  प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  


उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्र खरे की खोटी याची सत्यता पडताळण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. चौकशी पथकाने हातकणंगले पोलीस ठाण्यात पाच ते सहा शिवसैनिकांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे शिवसैनिकांसह हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारविरोधात जास्त आंदोलने झाली, त्याच जिल्ह्यांमध्ये कारवाई होत असल्याचा टोला संजय पवार यांनी लगावला. आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई गुन्हे शाखेला आमचे सर्व सहकार्य राहील, असेही संजय पवार म्हणाले.  


कोल्हापूरमधील 1400 ते 1500 शपथपत्र आम्ही तपासत असल्याचे पथकाने म्हटले आहे. या संदर्भात मुंबईतील निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथक कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहोचली आहेत. पोलीस अधीक्षकांचे कार्यालयामध्ये या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. ठाकर यांच्या समर्थनात दिलेली सुमारे साडे 4 हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे.  ठाकरे गटाच्या शपथपत्रांवरती शिंदे गटाने आक्षेप घेतला असून निवडणुक आयोगाकडे दोन्ही गटांकडून लाखो शपथपत्र सादर झाली आहेत. परंतु, ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप केला गेल्यानंतर याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. 


शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटाने धाव घेत पक्षावर दावा केला आहे. शिवसेना पक्ष आपल्याकडे राहावा यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जात आहेत.  काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे जवळपास 4600 च्या आसपास बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही प्रतित्रापत्रे ठाकरे गटांसाठी तयार केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. नोटरी करणारी व्यक्तीच प्रतिज्ञापत्र भरून देत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या