Sambhajiraje on Jayaprabha Studio : जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरात गेले 250  दिवस आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे, जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, अशा शब्दात स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.  


संभाजीराजे यांनी ट्विट करून सरकारच्या अकार्यक्षमतेवरून चांगलेच सुनावले आहे. त्यांनी ट्विट करून या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली. जिथे अनेक नामवंत मराठी व हिंदी चित्रपटांचे शूटिंग झाले, तो शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केला, या कलानगरीचा कणा असणारा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ हा विकसकाच्या घशात घातला जात आहे.






आंदोलकांकडून आत्मदहन करण्याचा प्रयत्न; पोलिसांशी झटापट 


वैभवशाली मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णकाळाची नोंद करणाऱ्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी गेल्या 250 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. गेल्या 250 दिवसांपासून आंदोलन करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आज स्टुडिओ वाचवण्यासाठी आत्मदहन आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली. 


जयप्रभा स्टुडिओ चित्रिकरणासाठी तत्काळ खुला झाला पाहिजे, स्टुडिओमधील इमारतीमधील खुली जागा आरक्षित रहावी, व चित्रीकरण सोडून कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये, कोल्हापूर मनपाने स्टुडिओ व्यावसायिक तसेच वाणिज्य वापरासाठी देऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी राज्य शासन आणि मनपाने लक्ष घालावे, आदी मागण्यांसाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलन गेल्या 250 दिवसांपासून सुरु आहे. 


जयप्रभाचा इतिहास


जयप्रभा स्टुडिओ ही छत्रपती राजाराम महाराज आणि भालजी पेंढारकर यांची आठवण आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी 1 ऑक्टोबर 1933 मध्ये कोल्हापूर सिनेटोन स्थापन केले. चित्रपटसृष्टीला हक्काचे साधन, कोल्हापूरचा विकास हा त्यामागचा उद्देश होता. या कामाची धुरा राजाराम महाराजांनी मेजर दादासाहेब निंबाळकर यांच्याकडे दिली. त्यांनी स्टुडिओचा कारभार भालजी पेंढारकरांकडे दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या