Hasan Mushrif : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आणखी 25 शेतकऱ्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा आणि तक्रारींचा तपास कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून करण्यात येणार आहे. 


संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी आणि इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफ यांनी 2012 मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले आणि सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


फसवणुकीच्या गुन्ह्यात दिलासा 


दरम्यान, ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. मुरगूडमध्ये दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 


दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्याने आरोप केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने तगडा झटका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा खडा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी 


दरम्यान, मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आतापर्यंत तीनवेळा चौकशी झाली आहे. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं दिलं असून या चौकशीमध्ये आपण त्यांना सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ईडीकडून गेल्या दोन महिन्यांत त्यांच्यावर तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. ईडीने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या :