Kolhapur News : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली, तरी गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यांमध्ये पाऊस सुरुच आहे. आज सकाळी शाहूवाडी तालुक्यामध्ये भूस्खलनची घटना झाल्यानंतर आता भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे गगनबावडा चौकात बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, करुळ घाटातून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु आहे. यासंदर्भात गगनबावडा पोलीस ठाण्याकडून माहिती देण्यात आली आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. आज सकाळी शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये भूस्खलन झाले होते. मात्र, दोन तासांमध्ये प्रशासनाने तातडीने कार्यवाही करताना रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता. त्यामुळे आता त्या मार्गावरून वाहतूक पूर्ववत झाली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग 


कोल्हापूर-वैभववाडी तसेच कोल्हापूर-रत्नागिरी


राज्यमार्ग 


कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडहिंग्लज-कोदाळी-भेंडशी, चिखली, वरणगे पाडळी- बाजारभोगाव-अनुस्करा, चंदगड-इब्राहिमपूर,बोरपाडळे-वाठार-वडगाव- हातकणंगले, अतिग्रे -कबनूर- इचलकरंजी-शिरढोण- टाकळी- खिद्रापूर, निढोरी-गोरंबे-कागल-यळगूड-रेंदाळ.


एसटी मार्ग 


कोल्हापूर ते गगनबावडा, इचलकरंजी ते कुरुंदवाड, गडहिंग्लज ते ऐनापूर, मलकापूर ते शित्तूर, चंदगड ते दोडामार्ग, गगनबावडा ते करूळ घाट, आजरा ते देवकांडगाव.


पंचगंगेची पातळी स्थिर


दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. काल दुपारपासून पंचगंगेची पातळी 41 फुट 7 इंचांवर पाणी पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट आहे, तर धोका पातळी 43 फुटांवर आहे. सध्या पंचगंगा इशारा पातळी वाहत असल्याने धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून आणि कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 


राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 


राधानगरी धरणाचा एक दरवाजा सकाळी बंद झाला असून सध्या चार दरवाजामधून विसर्ग सुरू आहे. धरणाच्या चार पाच सहा सात या स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. एकूण 7 हजार 312 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 


तुळशी धरणातून विसर्ग वाढवला


तुळशी धरण पूर्ण भरल्याने धरणातून 1700 क्युसेक्स विसर्ग पाण्यामध्ये सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये अजूनही 76 महिमा बंधारे पाण्याखाली आहेत त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या