Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कॅमेरा घेऊन बंदी करण्यात आली आहे. आज (16 मार्च) अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावरच माध्यमांना अडवण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी तसा आदेश काढल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्री अंबाबाईच्या मूर्तीचा मुद्दा समोर आला आहे. यावरुन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.


दरम्यान, अंबाबाईच्या मूर्तीची स्थिती नाजूक असल्याचे कोल्हापूरच्या माध्यमांनी समोर आणले होते. यानंतर पहिल्यांदा राज्य पुरातत्त्व आणि नंतर केंद्रीय पुरातत्त्वकडून पाहणी करण्यात आली आहे. मात्र, TRP साठी बातम्या दाखवल्या जात असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय पुरातत्त्वकडून पाहणी करताना मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप श्रीपूजकांच्या वकिलांनी केला आहे. 


मंगळवारी (14 मार्च) केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, विभागाने पाहणी करताना श्री अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात देवीच्या मूर्तीची दोन छायाचित्रे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.


लेपचा काही थर काढून टाकला


श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी श्रीपूजकांच्या वकिलांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला. कोणत्याही परवानगीशिवाय चेहऱ्यावर यापूर्वी लावलेला लेपचा काही थर काढून टाकला. लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा दावा श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे.


सद्यस्थितीत मूर्ती सुरक्षित 


केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी राजेश्वरी, शिवन्नाकुमार, राम निगम, उत्तम कांबळे यांनी मंदिरात मूर्तीची मंगळवारी पाहणी केली होती. या संदर्भातील केंद्रीय पुरातत्त्व विभाग लवकरच अहवाल सादर करणार आहे, या अहवालानंतर संवर्धनासंदर्भात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. सद्यस्थितीत मूर्ती सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या