Vijaydurg Fort : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अलौकिक कार्यकर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक किल्ल्यांना अखेरची घरघर लागली आहे. किल्ल्यांचा इतिहास लुप्त झाल्यानंतर गेंड्याच्या कातडीला जाग येणार का? अशी विचारणा आता शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमी लोकांकडून होत आहे. 


कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडनंतर (panhala fort landslide) विशाळगडावरही (Vishalgad Fort Landslide) बुरुज ढासळल्याने दोन्ही किल्ल्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या दोन किल्ल्यांची पडझड मनाला वेदना देत असतानाच मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र आणि शिवरायांनी पुर्नबांधणी करून घेतलेला विजयदुर्गही (Vijaydurg Fort) आता संकटात सापडला आहे. आता या संदर्भात माजी खासदार संभाजीराजे यांनी गडाची तटबंदीला फुगवटा आल्याने केंद्र सरकार, राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या संदर्भात 2020 मध्येच पत्रव्यवहार करून डागडूजी करण्यासाठी विनंती केली होती.



संभाजीराजे यांनी दिलेल्या माहितीनुसार डागडूजी संदर्भात पुरातत्व खात्याकडून संबंधित काम करण्यासाठी अवश्यक असलेल्या सर्व त्या परवानग्या घेतल्या आहेत. मात्र, विजयदुर्गाचे काम सुरू झालेलं नाही. 


अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या अनेक वास्तू आजही  बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यांचं जतन, संवर्धन करणं गरजेचं आहे. गडाच्या तटबंदीला काही ठिकाणी यावर्षी फुग आल्याचे दिसत असून, लवकर याकडे लक्ष न दिल्यास तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सरकार व केंद्र सरकार यांनी लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालावे;आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी जतन करावा हि सर्व शिवभक्तांच्या वतीने कळकळीची विनंती करत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या