Dhairyasheel Mane Rally in Kolhapur : बंडाळी केलेल्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचे आज कोल्हापूर जिल्ह्यात आगमन झाले. त्यांच्या आगमनानंतर किणी टोल नाका नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पेठवडगांव अशी तिरंग रॅली काढण्यात आली. धैर्यशील माने यांनी या रॅलीचे नेतृत्व करताना शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.  

Continues below advertisement

खासदार धैर्यशील माने बंडखोरीनंतर पहिल्यांदाच मतदारसंघांमध्ये परतले. यावेळी तिरंगा रॅली काढून खासदार धैर्यशील माने यांचे स्वागत करण्यात आले. हजारो दुचाकी घेऊन तरुण या रॅलीत सहभागी झाले. सगळ्यांच्या हातात तिरंगा ध्वज असल्याने भक्तीच्या आडून शक्तीप्रदर्शन असा प्रकार रॅलीत पाहायला मिळाला. 

खासदार म्हणतात, तर शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा एकत्र का नाही येणार?

दरम्यान, बंडखोर खासदार धैर्यशील माने यांनी काल एबीपी माझाशी संवाद साधला. आपापसातील मतभेद थांबावे आणि सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. एखाद्या माणसाला घर सोडताना जो त्रास होतो, तशीच माझीही मनस्थिती झाल्याचे माने म्हणाल, पण राजकीय परिस्थिती आणि भविष्य पाहता जनतेशी असलेल्या बांधिलकीसाठी निर्णय घेतल्याचे मानेंनी सांगितले. जर काँग्रेस शिवसेना एकत्र येऊ शकतात तर शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा एकत्र का नाही येणार? असेही ते म्हणाले.

Continues below advertisement

आदित्य ठाकरे आणि माझ्यातील जिव्हाळा हा राजकारणापलीकडील 

आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला वेळोवेळी भेट दिली. पण मी सुचवलेली, माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लागली नाहीत, केवळ एकच काम मार्गी लागल्याचे मानेंनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न केले नाहीत असे मी म्हणणार नाही, पण तीन लोकांचे सरकार असल्यामुळं त्यामध्ये काही अडचणी येत होत्या. असे माझ्याच बाबतीत नाही तर सर्वच खासदारांच्या बाबतीत घडल्याचे मानेंनी यावेळी सांगितले. 

आदित्य ठाकरे आणि माझ्यातील जिव्हाळा हा राजकारणा पलिकडचा आहे. मी कायम त्यांच्यासोबत होतो असेही ते म्हणाले. राजकीय दुरावा निर्माण झाला म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो नसल्याचेही मानेंनी सांगितले.