मुंबई: कोल्हापूरची संस्कृती बघितली तर ही निवडणूक बिनविरोधी व्हायला पाहिजे होती, पण भाजपनं ही निवडणूक लावली. पण चार राज्यातील जनता वेगळी आणि कोल्हापूरची जनता वेगळ्या विचारांची आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं असं कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले. कोरोनाच्या संकटात कोल्हापुरात कोण होतं आणि पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहीत आहे असा टोलाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ बोलत होते. 


आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. पण पण भाजपनं ही निवडणूक लावली. पण चार राज्यातील जनता वेगळी आणि कोल्हापूरची जनता वेगळ्या विचारांची आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं. कोरोनाच्या संकटात कोल्हापुरात कोण होतं आणि पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहीत आहे. 


ऋतुराज पाटील म्हणाले की, कोल्हापूर शहरातून पहिल्यांदा एका महिलेला आमदार होण्याचा मान मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून युवक युवतींना क्रीडा, शैक्षणिक पातळीवर काम सुरू आहे. एक हजार स्टार्टअप निर्माण केले जाणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 


भाजपचे नेते वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करत आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर एका विचाराच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असंही ते म्हणाले. 


दरम्यान, कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकात जाधव यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली असून जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी तळ ठोकला आहे. 


संबंधित बातम्या: