मुंबई : मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांचा जामीन अर्ज मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला. यांना जामीन दिल्यास पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भूमिका घेत पोलिसांनी या जामिनास विरोध केल्यानं कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळून लावला.


त्याचबरोबर गुन्हा नोंदवताना पोलिसांनी लवलेली कलमही तगडी असल्यानं मनसैनिकांची तातडीनं सुटका करण्यास कोर्टानं नकार दिला. मात्र किला कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला असला तरी वरच्या कोर्टात अर्ज करण्याचा पर्याय अजूनही खुला आहे. त्यानुसार गुरुवारी सत्र न्यायालयात आठही जणांच्या वतीने जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

या आठ जणांमध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारे मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यासह अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरीष सोलंकी आणि दिवाकर पडवळ यांचा समावेश आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी म्हणजे 4 डिसेंबर रोजी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्याप्रकरणी अटकेत असलेले मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह 8 मनसे कार्यकर्त्यांना मुंबईच्या किला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावताच सर्वांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर आज किला कोर्टात सुनावणी झाली आणि कोर्टाने अर्ज फेटाळला.